

छत्रपती संभाजीनगर : तीन अपत्ये, अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम यासह शहागंजमधील अतिक्रमणाला प्रोत्साहन दिल्याच्या आरोपांवरून नगरसेवकांविरोधात दाखल करण्यात आलेल्या अपात्रतेच्या तक्रारींच्या सुनावणी सोमवारी (दि. २४) महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्यासमोर घेण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात नऊ नगरसेवक-नगरसेविकांच्या प्रकरणांचा समावेश होता.
यावेळी तक्रारदारांचे म्हणणे आणि पुरावे ऐकल्यानंतर संबंधित सदस्यांनी कागदपत्रांचा अभ्यास करून आपले म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितली. यावरून आयुक्तांनी मुदतवाढ देत पुढील सुनावणीची तारीख संबंधितांना लेखी कळविली जाणार आहे. नगरसेवकांच्या सदस्यत्वाच्या अपात्रतेसंदर्भातील महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम १० (१) आणि १० (१-ड) अन्वये टप्प्याटप्प्याने सुनावणी - घेतली जात आहे.
महापालिका - निवडणुकीनंतर एमआयएमच्या १८, भाजपच्या सहा आणि शिवसेना शिंदे गटाच्या एका अशा एकूण २५ - नगरसेवकांविरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत. यापैकी १७ ऑगस्टला नऊ, तर सोमवारी आणखी नऊ प्रकरणांवर सुनावणी झाली. यावेळी प्रत्येक तक्रारीची स्वतंत्रपणे सुनावणी घेण्यात आली. काही नगरसेवकांनी कायदेशीर बाजू मांडण्यासाठी वकिलांची मदत घेतली. तक्रारींसोबत सादर करण्यात आलेले पुरावे आणि कागदपत्रे तपासण्यासाठी संबंधित सदस्यांनी वेळ मागितला.
आयुक्तांनी ही मागणी मान्य केली असून पुढील सुनावणीची तारीख संबंधितांना लेखी कळविली जाणार आहे. त्यामुळे ७ सप्टेंबरला नऊ, तर १५ सप्टेंबरला ११ सदस्यांच्या प्रकरणांवर सुनावणी होणार आहे.
दरम्यान, नगरसेवक फेरोज खान, शेख नरगीस सलीम आणि मोहम्मद वसीम यांच्याविरोधात दोनपेक्षा अधिक अपत्ये असल्याच्या तक्रारी आहेत. तर नगरसेवक मोहम्मद वाजेद आणि मेराज खान यांच्याविरोधात अतिक्रमणाला प्रोत्साहन दिल्याच्या आरोपांवरून तक्रारी दाखल आहेत. तसेच विरोधीपक्षनेता अब्दुल समीर, नगरसेवक सय्यद सोहेल, भारती सोनवणे आणि हिवराळे जिवकपाल यांच्याविरोधात अतिक्रमण व अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी आहेत.
अनधिकृत बांधकाम पाडले, तरी रखडला निर्णय
भाजपच्या दोन नगरसेवकांविरोधात अनधिकृत बांधकाम केल्याच्या तक्रारी आहेत. प्रशासनाची नोटीस मिळण्यापूर्वीच संबंधितांनी बांधकाम पाडून घेतल्याचा तक्रारदारांचा दावा आहे. या कारवाईचे छायाचित्रे व व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे अनधिकृत बांधकाम झाल्याचे स्पष्ट होत असतानाही निर्णयाला विलंब का, असा सवाल तक्रारदारांकडून उपस्थित केला जात आहे.
१७ ऑगस्टला नऊ प्रकरणे
१७ ऑगस्ट रोजी अभिजीत जीवनवाल, गणेश नावंदर, नुरजहान इकबाल, फिरोज खान, खान अब्दुल मतीन, मोहम्मद वसीम, सय्यद सोहेल, मेराज खान आणि मुंशी भिकन शेख यांच्या प्रकरणांवर सुनावणी झाली. यामध्ये अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम, अतिक्रमणाला प्रोत्साहन आणि दोनपेक्षा अधिक अपत्ये या कारणांचा समावेश आहे.