

घाटनांद्रा, पुढारी वृत्तसेवा: सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा परिसरात वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. यामुळे शनिवारी (दि.२८) सकाळी बस स्थानक परिसरात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी घेराव घातला. यावेळी वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.
सध्या रब्बी हंगाम सुरू झाला असून विद्युत पंप चालवण्यासाठी विजेची गरज आहे. परंतु, मागील एक महिन्यापासून या भागात सतत पाच ते सहा तास वीजपुरवठा बंद राहत आहे. इतर वेळेस वीजपुरवठा कमी दाबाने सुरू राहतो. त्यामुळे वीज असून अडचण आणि नसून खोळंबा अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य आनंद मोरे, मोहीद मुल्ला व इतर ग्रामस्थांनी केली आहे.
आमठाणा येथील महावितरणाचे कनिष्ठ अभियंता मनोज सोन्ने यांनी सांगितले की, महावितरणाचे 132 केव्ही स्टेशन तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या पिशोर येथे आहे. तेथून वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. सध्या सर्वत्र विद्युत पंप चालू झाल्याने विजेची मागणी वाढली आहे. त्यामुळे वीज प्रवाह खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. आमठाणा येथील सब स्टेशनला 132 केव्ही स्टेशन मंजूर करण्याचा प्रस्ताव दाखल केला आहे.
हेही वाचा