

Center approves floating solar in Nathsagar
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: राठवाड्याचा तारणहार असलेल्या जायकवाडी धरणातून वर्षाला २८ टक्के पाण्याचे बाष्पीभवन होते. हे बाष्पीभवन रोखण्यासाठी धरणाच्या पाण्यावर फ्लोटिंग सोलार टाकण्याच्या प्रकल्पाला केंद्राच्या नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनने मंजुरी दिली आहे. दहा हजार कोटी रुपये खर्चुन या सोलार प्रकल्पातून १३४२ मेगा वॅट वीज निर्मिती केली जाणार आहे, अशी माहिती शुक्रवारी (दि.३१) माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉ. भागवत कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
केंद्राने २०३० सालापर्यंत ५०० गि.गा वॅट हरित ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार जायकवाडी धरणात हे सोलार उभारण्यात येत आहे. माजी केंद्रीय मंत्री डॉ. कराड म्हणाले की, २०१८ साली मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष असताना जायकवाडी धरणात फ्लोटिंग सोलार टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबत तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती. त्यांच्या मंजूरीने प्रस्ताव केंद्राकडे गेला होता. या प्रकल्पाला जायकवाडी धरण परिसरातील मासेमारी करणाऱ्यांनी विरोध केला होता.
हा परिसर बर्ड सेंचुरीत मोडतो. त्यामुळे येथे असा प्रकल्प करण्यास बंदी घालण्याची मागणीही केली जात होती. या प्रकल्पाला राज्याचे तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी मंजुरी दिली. त्यानंतर हा प्रकल्प तत्कालीन केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंजुरी दिली. त्यानंतर एनटीपीसीने या प्रकल्पाची सखोल तपासणी केली. त्यांच्या पथकाने जायकवाडी धरणाची पाहणी केली. यातील १० हजार चौरस मीटरमध्ये फ्लोटिंग सोलार टाकला जाणार आहे. धरणाच्या एकूण क्षेत्रापैकी केवळ १२ टक्के क्षेत्रावरच सोलार असेल. राज्य आणि एनटीपीसीचा करार होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन होईल. मराठवाड्यात परळी प्रकल्पातून ११०० मेगावॅट आणि नाशिकमध्ये ६०० मेगावॅट वीज निर्मिती होते.
धरणाचे क्षेत्र ३४ हजार हेक्टर
जायकवाडी धरण हे ३३ हजार ९८९ हेक्टर क्षेत्रात विस्तारलेले आहे. त्यापैकी १० हजार एकरमध्येच प्रकल्प होईल. धरणाची पाणी साठवण क्षमता १०२ टीएमसी असून, धरणाच्या दक्षिण बाजूस दोन आणि उत्तर बाजूस एक असे तीन ठिकाणी सेंटर होणार आहेत. देशात मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर येथे ६०० मेगा वॅटचा तर तेलंगणाच्या रामगुंडममध्ये १०० मेगा वॅट, केरळच्या कायमकुलममध्ये ९२ मेगावॅटचा, आंध्रप्रदेशातील सिमांद्रीमध्ये २५ मेगावॅट, झारखंडमध्ये १०० मेगावॅट, विहान १५० मेगा वॅटचा प्रकल्प आहे.