

BJP is preparing to establish power in the Municipal Corporation, leaving Shinde Sena aside
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यातील पाच महापालिकांपैकी लातूर येथे काँग्रेसने आणि परभणी येथे शिवसेना उबाठाने बहुमत मिळविले. तर नांदेड आणि जालना महापालिकेत भाजपने स्पष्ट बहुमतासह सत्ता काबीज केली. छत्रपती संभाजीनगरात भाजप बहुमतापासून एक जागा दूर राहिले. या ठिकाणी भाजपने मित्रपक्ष शिवसेनेला बाजूला ठेवून छोट्या पक्षांच्या मदतीने सत्ता मिळविण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्या अनुषंगाने भाजपने छोट्या पक्षांसोबतच चर्चाही सुरू केली आहे.
राज्यात भाजप आणि शिवसेना हे मित्र पक्ष आहे. आतापर्यंत मराठवाड्यातही या दोन्ही पक्षांनी सर्व निवडणुका एकत्रितपणे लढविल्या. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत मात्र महायुतीत बिघाडी झाली. दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढविल्या. त्यात पाच महापालिकांपैकी तीन ठिकाणी भाजपच मोठा पक्ष झाला. जालना आणि नांदेडमध्ये भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपला ५७ जागा मिळाल्या.
या ठिकाणी सत्ता स्थापनेसाठी ५८ जागांची गरज आहे. शिवसेनेला इथे १३ जागा मिळाल्या. मात्र, आता शिवसेनेला सोबत घेण्याऐवजी छोट्या पक्षांची मदत घेऊन सत्ता मिळविण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. भाजपला केवळ एकाच नगरसेवकाची गरज आहे. त्यासाठी इतर पक्षांशी चर्चा सुरू केली आहे. त्यामुळे तीस वर्षांपासून सत्तेत असलेली शिवसेना छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सत्तेपासून दूर राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ११५ पैकी ५७ जागी भाजपने विजय मिळविला आहे. त्यांना महापौर पदासाठी अवघ्या एका नगरसेवकाची गरज आहे. आतापर्यंत मनपात शिवसेनेसोबत भागीदार असलेला भाजप येथे अवघ्या १३ जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला सोबत घेण्यास अनुत्सुक दिसतो. सेनेला सोबत घेऊन सत्तेत वाटेकरी करण्याऐवजी अन्य पक्षासोबत हात मिळविणी करत सेनेला दूर ठेवण्याचा भाजपचा इरादा दिसत आहे.
जालना येथे ६५ पैकी तब्बल ४१ जागा मिळवित भाजपने सत्ता काबीज केली. तिथे शिंदे गटाचे १२ नगरसेवक विजयी झाले. तिथेही भाजपला शिंदे सेनेसोबत युती करण्याची गरजच राहिलेली नाही.
नांदेड येथे भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. या ठिकाणी ८१ पैकी भाजने ४५ जागा मिळविल्या. त्यामुळे तिथे मित्रपक्षाची गरज उरलेली नाही. तसेच भाजप हा चार जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला सत्तेत वाटेकरी करून घेण्यास उत्सुक नाही.
लातूर महापालिकेत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळविण्यात यश आले. तिथे काँग्रेसने ७० पैकी ४७ जागा मिळविल्या. परभणी महापालिकेत शिवसेना उबाठा पक्षाने पहिल्यांदाच बहुमत मिळविले. तिथे ६५ पैकी तब्बल ३६ जागा ठाकरे गटाला मिळाल्या आहेत.
सत्तेचे वाटेकरी कशाला करायचे ?
नांदेड, जालना येथे भाजपला स्पष्ट बहुमत आहे. तर संभाजीनगरातही शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय सत्ता मिळविता येऊ शकते. मग या सर्व ठिकाणी शिवसेनेला सोबत घेऊन सत्तेत मोठा वाटा कशाला द्यायचा अशी भावना भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आहे.