

All-party protest against the authority in Bidkin
बिडकीन, पुढारी वृत्तसेवा : प्राधिकरणाची प्रस्तावित कार्यवाही थांबवावी, बिडकीन गावाच्या हद्दीतील टोल नाका रद्द करावा आणि बायपास रस्ता करावा, या प्रमुख मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) च्या संयुक्त विद्यमाने प्रदेश नेते अमोल नरवडे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. ९) बिडकीन येथे सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शेकडो महिला-पुरुषांनी चार तास ठिय्या देत जोरदार एल्गार केला. आंदोलनस्थळी प्राधिकरण व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून आंदोलकांशी संवाद साधला. मागण्यांबाबत सकारात्मक प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची हमी दिल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली.
बिडकीन परिसरातील व्यापारी व नागरिकांच्या अतिक्रमणासंदर्भातील प्रश्न, तसेच छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून गावठाण हद्दवाढीसंदर्भात करण्यात येणाऱ्या कार्यवाहीला आंदोलकांनी विरोध दर्शविला. गावठाण हद्दवाढीसह विविध मागण्यांबाबत शासनाच्या नगरविकास व नगररचना विभागाकडे सकारात्मक प्रस्ताव व शिफारशींसह पाठविण्याची मागणी करण्यात आली.
याचबरोबर बिडकीन गावाच्या हद्दीतून होणारा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा टोल नाका रद्द करावा, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बायपास रस्ता करावा अशी मागणीही करण्यात आली. या मागण्यांसाठी अमोल नरवडे यांनी संबंधित विभागांना लेखी पत्रव्यवहार करून ९ सप्टेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. तसेच या मागण्यांसंदर्भात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना निवेदन देऊन प्रश्न सोडविण्याची मागणी करण्यात आली होती.
बुधवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून आंदोलकांनी फलक हातात घेऊन रॅली काढली. शेकटा फाटा ते निलजगाव फाटा या मार्गावर रॅलीदरम्यान नागरिकांचा सहभाग वाढत गेला. शेकडो महिला-पुरुषांनी ठिय्या देत रास्ता रोको केला. आंदोलनात दोन्ही शिवसेना गटांचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य मनोज पेरे, भुमरे गटाचे जिल्हा युवा अध्यक्ष काकासाहेब टेके, उबाठा गटाचे विकास गोर्डे, सरपंच अशोक धर्मे, रॉकॉपा चे जील्हा उपाध्यक्ष तमीजोद्दीन इनामदार व्यापारी संघ. प्रतिनिधी ओमप्रकाश जैस्वाल, माजी. सरपंच हारुण जीलानी. कृष्णा चौथमल, हसन चाऊस. ज्येष्ठ नेते नन्हेखॉ पठाण यांच्यासह युवा कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनामुळे बिडकीन परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र, प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली. टोल नाका रद्द, बायपास रस्ता आणि प्राधिकरणाच्या कार्यवाहीसंदर्भातील मागण्यांवर आता शासन कोणता निर्णय घेते, याकडे बिडकीन परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
टोल नाका हटविण्याबाबत प्रस्ताव
आंदोलनादरम्यान प्राधिकरणाच्या वतीने सातोळकर तसेच एनएचएआयचे कुलकर्णी यांनी आंदोलकांशी संवाद साधला. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करून टोल नाका हटविण्याबाबत तसेच बायपास रस्त्यासाठी पर्यायी मार्ग काढण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तिन्ही मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात आलेल्या पत्रात, आंदोलकांच्या मागण्यांबाबत शासनाकडे प्रस्ताव व शिफारशींसह सादर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे.