

Abhijit Dipke: The court has done justice to the students
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा नीट पेपर फुटीमुळे अनेकांना आपली मुले गमवावी लागली. या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी तसेच आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे या मागणीसाठी कॉक्रोज जनता पार्टीच्या वतीने गेल्या महिनाभरापासून पाठपुरावा सुरू होता. न्यायालयाने विद्यार्थ्यांसोबत न्याय केला आहे. आमच्या दोन्ही मागण्या मान्य करण्यात आल्याने देशातील तरुणांनाचा हा खूप मोठा विजय आहे असे सांगून सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी न्यायालयाचे आभार मानले.
माध्यमांशी बोलताना अभिजीत दीपके म्हणाले दोन - तीन दिवसांपूर्वी दिल्लीचे शिष्टमंडळ महाराष्ट्रात आले होते. छत्रपती संभाजीनगरात त्यांच्यासोबत आमच्या सात-आठ बैठका झाल्या. यावेळी आम्ही त्यांना नीट पेपर फुटीमुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबीयांना खूप काही सोसावं लागल्याचे सांगून त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी तसेच दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी केली होती.
या मागण्या मान्य झाल्या नाही तर ५ सप्टेंबरपासून पुन्हा आंदोलन करू असा इशारा दिला होता. येथून याचा तोडगा निघाल्याने एक मराठी म्हणून याचा मला अभिमान आहे. नीट पेपर फुटीमुळे अनेक कुटुंबीयांना आपली मुले गमवावी लागली त्यातील एका मुलीच्या वडिलांना पॅरलिसिसचा आजार आहे. घरात उत्पन्नाचे श्रोत नसल्याने त्यांना त्यांच्या लहान मुलाच्या शिक्षणाची चिंता आहे. आता सरकारच्या वतीने मुले गमावलेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळणार आहे.
हा विजय एकट्या सीजेपीचा नाही. हा विजय त्या प्रत्येक व्यक्तीचा आहे जो रस्त्यावर उतरला, कोणी सोशल मीडियावर पोस्ट केली. तुमच्या समर्थनाशिवाय तसेच तुम्ही आवाज उठवला नसता तर हे शक्य झाले नसते. सरकारने ही आमचे ऐकले नसते.
जर त्यांना दिसले नसते की सीजेपीच्या मागे एवढ्या मोठ्या लोकांचे समर्थन आहे. तर कोणीही आमचे ऐकले, नसते. ही सर्व लोकांची ताकद आहे की दिल्लीच्या शिष्टमंडळाने छत्रपती संभाजीनगर येथे येऊन तोडगा काढला-