

छत्रपती संभाजीनगर : शहरातील रेल्वेस्टेशन ते ज्युबिली पार्क मार्गावरील ७०० मिमी जलवाहिनी फुटल्यामुळे तब्बल २५ तास पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. मनपाच्या पथकाने गुरुवारी (दि.१९) युद्धपातळीवर व्हॉल्व दुरुस्तीचे काम करून शुक्रवारी (दि.२०) पहाटे साडेतीन वाजता पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला. त्यानंतर काही भागांना तात्काळ पाणी सोडण्यात आले.
गुढीपाडवा आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातील महत्त्वाच्या जलवाहिनीला गळती लागल्याने पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला. गुरुवारी पहाटे दोन वाजेपासून रेल्वेस्टेशन गेटसमोरील व्हॉल्व बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. मनपाच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत खोदकाम सुरू केले. तपासणीदरम्यान जलवाहिनीचा पाईप खालून तुटल्याचे आढळले. त्यानंतर जुना पाईप काढून टाकत सुमारे साडेपाच मीटर लांबीचा नवीन पाईप बसवण्यात आला. हे काम अखंड सुरू ठेवत शुक्रवारी पहाटे तीन वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आले.
यानंतर व्हॉल्व सुरू करताच ज्युबिली पार्क जलकुंभाकडे पाणीप रवठा पुन्हा सुरू झाला. काही वेळातच परिसरातील वसाहतींनाही पाणी मिळाले. या कामात मनपाचे उपअभियंता किरण धांडे, सहाय्यक अभियंते आणि कर्मचारी सक्रिय होते. दरम्यान, या बिघाडामुळे बुड्डीलाइन,जुना बाजार, आसेफिया कॉलनी, जयभीमनगर व घाटी परिसरातील पाणीपुरवठा ठप्प झाला होता. तसेच शहराच्या नियोजित पुरवठा वेळापत्रकात एक दिवसाचा बदल करावा लागला. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर आज शनिवारी (दि.२१) काही भागांना प्राधान्याने पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पाणीपुरवठ्यावर परिणाम
जलवाहिनी फुटल्यामुळे शहरातील अनेक भागांना एक दिवस पाणी मिळाले नाही. मनपाला नियोजित वेळापत्रक पुढे ढकलावे लागले. सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी दुरुस्तीचे काम जलद गतीने पूर्ण करण्यात आले. आता पुरवठा पूर्ववत झाला असून, पुढील काही दिवसांत वेळापत्रक सुरळीत होणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली.