

Yedeshwari has done it! Sugarcane farmers' installments directly into their accounts
केज, पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यात ऊस दरवाढीसाठी शेतकऱ्यांचे सुरू असलेले आंदोलन, आर्थिक ताण, वाढते खर्च आणि कारखान्यांकडून दर पडण्याच्या भीतीच्या वातावरणात येडेश्वरी साखर कारखान्याने दिलेली मोठी दिलासादायक भेट शेतकऱ्यांसाठी 'रामबाण' ठरली आहे.
२०२५-२६ गळीत हंगामात ऊसउत्पादकांच्या हाती तातडीची आर्थिक मदत म्हणून पहिला हप्ता प्रति टन २८०० रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व कारखान्यांमध्ये हा सर्वाधिक प्रारंभिक दर असून, यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे.
येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन आणि खा. बजरंग सोनवणे यांनी शेतकऱ्यांना आश्वासन देताना स्पष्ट केले की, शेतकऱ्यांच्या हक्काचा दर द्यायलाच आम्ही बांधील आहोत. अंतिम दर तीन हजार रुपयांपेक्षाही अधिक देण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. गाळप पूर्ण झालेल्या ऊसाचा पहिला हप्ता खात्यावर जमा झाल्याने बी-बियाणे, मजुरी, खत, औषधे, वाहतूक आणि दैनंदिन खर्चासाठी शेतकऱ्यांना मोठा हातभार मिळणार आहे.
विशेष म्हणजे २०२४-२५ या हंगामात १० रिकव्हरीप्रमाणे एफआरपी फक्त २४०० रुपये मिळत होते. त्याच्या तुलनेत येडेश्वरीने थेट २८०० रुपयांचा हप्ता देऊन शेतकरी हिताचा नवा आदर्श रचला आहे. ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी यावर आपली प्रतिक्रिया देताना जिल्ह्यात पहिल्यांदाच एखाद्या कारखान्याने एफआरपीपेक्षा एवढा जास्त दर आगाऊ दिला. आमच्या बाजूने ठाम उभा राहणारा हा खरा शेतकरीहिताचा कारखाना आहे, असे सांगितले. येडेश्वरी कारखान्याने रकमेचा हप्ता जाहीर करताच जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांवरही शेतकरी हिताचा दबाव निर्माण झाला आहे. वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर इतर कारखानेही दर वाढवतील का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.