

कडा : आष्टी तालुक्यातील वनवेवाडी येथील अंगणवाडीमध्ये चिमुकल्या बालकांना दिला जातो. त्यांच्या या पोषण आहाराच्या खिचडीत चक्क अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या प्रकारामुळे पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, “बालक आणि विद्यार्थी हेच देशाचे भावी शिल्पकार आहेत. त्यांच्या आरोग्याची, शिक्षणाची आणि पोषणाची योग्य काळजी घेणे ही समाजाची व प्रशासनाची सामूहिक जबाबदारी आहे.”परंतु याठिकाणी वारंवार चिमुकल्या बालकांच्या आरोग्याशी अक्षरशः खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप पालकांकडून करण्यात आला आहे.
गुरुवारी अंगणवाडीतील एक बालक खिचडीचा डबा घरी घेऊन गेले. बालक घरी खिचडी खात असताना त्यामध्ये अळी आढळून आली. हा प्रकार पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.यानंतर बालकाचे वडील गणेश राजेंद्र बनसोडे यांनी संबंधित खिचडीचे छायाचित्र घेऊन ‘पत्रकारांशी संपर्क साधला. तसेच या प्रकाराबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे ऑनलाइन तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले.
पालकांच्या म्हणण्यानुसार, अंगणवाडीच्या पोषण आहाराबाबत यापूर्वीही तक्रारी झाल्या असून, वारंवार अशा प्रकारे बालकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे केवळ संबंधित घटनेची चौकशी करून हा विषय संपवण्याऐवजी अंगणवाडीतील पोषण आहाराची गुणवत्ता, स्वच्छता,साठवणूक आणि वितरण व्यवस्थेची सखोल तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
चिमुकल्या बालकांना कुपोषणापासून दूर ठेवण्यासाठी शासनाकडून पोषण आहार दिला जातो. मात्र त्याच आहारात अळ्या आढळत असतील तर ‘पोषण’ नेमके कोणासाठी आणि कोणाच्या निष्काळजीपणामुळे बालकांच्या ताटात काय वाढले जात आहे? असा संतप्त सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच संबंधित महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने अंगणवाडीची पाहणी करावी,उपलब्ध अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घ्यावेत आणि दोष आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांनी केली आहे.
‘तक्रार केली असती तर नमुने तपासणीसाठी पाठवले असते’ ; ज्योती बेल्हेकर
याबाबत एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेल्हेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, संबंधित पालकांनी आमच्याकडे तक्रार केलेली नाही. हा प्रकार कालच निदर्शनास आणून दिला असता तर खिचडीचे नमुने तपासणीसाठी पाठवले असते. अंगणवाडीतील खिचडी घरी देण्यात येत नाही.त्यामुळे घरी गेल्यानंतर अळी पडली की खिचडीमध्ये आधीपासूनच होती, याबाबत सध्या स्पष्टता करता येणार नाही. याप्रकरणी सुपरवायझरला अंगणवाडीमध्ये पाठवून तपासणी करण्यात येईल. तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी संबंधितांना आवश्यक सूचना देण्यात येतील.
पालकांचा सवाल...
“अंगणवाडीत येणाऱ्या चिमुकल्यांना सुरक्षित आणि दर्जेदार पोषण आहार देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. खिचडीत अळ्या आढळत असतील तर याची जबाबदारी निश्चित करून कारवाई कधी होणार?” असा सवाल संतप्त पालकांनी उपस्थित केला आहे.