

बीड : उमेद (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) अभियानात कोट्यवधी रुपयांचा मानधन अपहार व गंभीर प्रशासकीय गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी कठोर कारवाई करत गैरव्यवहारात दोषी ठरलेल्या ८ तालुका व्यवस्थापक व प्रभाग समन्वयकांना कार्यमुक्त करून राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष, नवी मुंबई येथे वर्ग करण्याचे आदेश जारी केले आहेत.
धारूर व शिरूर कासार तालुक्यातील प्रभाग संघ, ग्रामसंघ आणि महिला सीआरपी सदस्यांच्या मानधनात लाखो रुपयांचा अपहार झाल्याच्या तक्रारी श्रीमती सुमित्रा गिते व इतर महिला सदस्यांनी केल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे विभागीय आयुक्त कार्यालय (छत्रपती संभाजीनगर) यांच्या सूचनेनुसार जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीने सखोल चौकशी केली. चौकशी अहवालात शासकीय निधीचा अपहार, पदाचा गैरवापर, कर्तव्यात गंभीर कसूर आणि आर्थिक अनियमितता स्पष्टपणे निष्पन्न झाली. संबंधित कर्मचाऱ्यांचे खुलासे अमान्य करत प्रशासनाने ही कठोर कारवाई केली असून, त्यांचा पदभार तात्काळ हस्तांतरित करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या गंभीर अपहार प्रकरणात दोषी आढळलेल्या सर्व ८ कर्मचाऱ्यांची बीड जिल्ह्यातील सेवा तात्काळ समाप्त करून त्यांची रवानगी नवी मुंबईतील मुख्य कार्यालयात करण्यात आली आहे.
कार्यमुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे
संजय नामदेव गायकवाड (तालुका व्यवस्थापक, पं.स. धारूर)
ओमकार मनोहरराव पंडित (तालुका व्यवस्थापक, पं.स. धारूर)
राहुल सुभाष तनपुरे (तालुका व्यवस्थापक, पं.स. धारूर)
सॅम्युअल जयंत गावित (प्रभाग समन्वयक-भोगलवाडी, पं.स. धारूर)
श्रीमती सुप्रभा संजय खेडकर (तालुका व्यवस्थापक, पं.स. शिरूर कासार)
अमोल आदिनाथ गर्जे (प्रभाग समन्वयक-रायमोहा, पं.स. शिरूर कासार)
श्रीमती पुष्पा रवींद्र नगरगोजे (प्रभाग समन्वयक-मातोरी, पं.स. शिरूर कासार)
बाबासाहेब अर्जुन गुंड (प्रभाग समन्वयक-पिंपळनेर, पं.स. शिरूर कासार)