

Will follow up to get justice for Sampadatai: Manoj Jarange
बीड, पुढारी वृत्तसेवा : संपदाताईला न्याय मिळण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे. मुंडे कुटुंबीयांनी चार मागण्या केल्या, त्यातील एक मार्गी लागली आहे, उर्वरित तीन मागण्या आपण मार्गी लावू. या विषयावर मी अजित पवार यांच्याशी देखील चर्चा करणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. जरांगे पाटील यांनी शनिवारी सायंकाळी वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे मुंडे कुटुंबीयांची भेट घेतली, यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
वडवणी तालुक्यातील कवडगाव येथील डॉ. संपदा मुंडे यांनी फलटण येथे कार्यरत असताना आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी सायंकाळी भेट घेतली. यावेळी मुंडे कुटुंबीयांनी या प्रकरणाची माहिती जरांगे पाटील यांना दिली. यावेळी जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींना फोन लावत एसआयटीबाबत माहिती घेतली.
यानंतर जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील दूरध्वनीवरून संवाद साधत या प्रकरणाविषयी माहिती दिली. यानंतर माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री स्वतः या प्रकरणात लक्ष घालत आहेत. मुंडे कुटुंबीयांना न्याय मिळणारच. या प्रकरणाला वेगळं वळण लागू देणार नाही, ताईला न्याय कसा मिळेल यासाठीच हा लढा लढला जाणार आहे. राजकारणी मचळा असला की मला काही सुचत नाही, पण मी या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहणार आहे. या प्रकरणाविषयी मी अजित पवार यांना देखील बोलणार आहे, यानंतर तेही सतर्क राहतील आणि कोठेही काहीही बोलणाऱ्यांना आवर घालतील. या प्रकरणात राजकारणी काय बोलले माहीत नाही, मी आजच लक्ष घातले आहे, या कुटुंबाने ज्या मागण्या केल्या त्यावरच यापुढील आमचे लक्ष राहणार असल्याचे देखील मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार अधिकारी घ्या
मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींना फोन लावल्यानंतर या प्रकरणात तपासासाठी एसआयटी नियुक्त केली असली तरी कुटुंबीय सांगतील त्या अधिकाऱ्याचा समावेश करा. तसेच एसआयटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करा अशी कुटुंबीयांची मागणी आहे, त्यावर देखील निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींनी सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री देखील या प्रकरणात लक्ष घालत असल्याची माहिती दिली.