![बीड : संपत्तीच्या वादातून सख्या भावाचा खून; भावासह तिघांना जन्मठेप](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F03%2Fcourt.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
माजलगाव; पुढारी वृत्तसेवा : संपत्तीच्या वादातून सख्या भावाचा खून केल्याप्रकरणी माजलगाव येथील भावासह आई व भावजयवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी येथील अतिरिक्त सत्र न्यायधीश बी.जी.धर्माधिकारी यांच्या न्यायालयात आज (दि८) सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने तिघांना दोषी ठरवत जन्मठेपेसह ५ हजार दंडाची शिक्षा सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाञुड येथील इर्शाद शेख याचे मोबाईल दुकान आहे. या दुकानात इर्शादचा भाऊ अरशद यांच्याशी संपत्तीच्या वादातून जोरदार भांडण झाले. यावेळी पत्नी व आई दुकानात होत्या. वाद वाढत गेल्याने भाऊ अरशाद याने आई व पत्नीच्या मदतीने इर्शादवर चाकूहल्ला करत त्याचा खून केला. याप्रकरणी इर्शाद याची पत्नी अखीला हिने माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरशाद शकील शेख, हानीफा शकील शेख, व माहेरा आरशद शेख या तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली.
सहायक पोलीस निरीक्षक एन. आर. इधाटे यांनी गुन्हयाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण अकरा साक्षीदार तपासण्यात आले. सर्व साक्षीदारांच्या साक्षी व सरकार पक्षाने केलेला महत्वपूर्ण युक्तीवाद ग्राहय धरून अतिरिक्त सञ न्यायधीश बी.जी.धर्माधीकारी यांनी आरशाद शेख, हानीफा शेख, व माहेरा शेख या तिघांना दोषी ठरवत मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षाकडून माजलगांव येथील वरिष्ठ सरकारी वकील रणजित अ. वाघमारे यांनी बाजु मांडली व फिर्यादी तर्फे माजलगांव येथील ज्येष्ठ विधीज्ञ श्यामसुंदर के. गोंडे यांनी सरकार पक्षास मदत केली.
हेही वाचा :