

पुढारी ऑनलाईन डेस्क : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh murder case) हत्याकांड प्रकरणात रोज नवीन माहिती समोर येत आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आणखी एक धक्कादायक माहिती उघड केली आहे. दमानिया यांनी मृत संतोष देशमुख यांच्यावर अनैतिक संबंधाचा आरोप करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या महिलेची हत्या झाल्याचे म्हटले आहे.
दमानिया यांनी सोशल मीडिया एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, "बीडमधील गुंड संपता संपत नाही आणि येथील हत्यादेखील संपता संपत नाहीत. मृत देशमुखांवरअनैतिक आरोप करण्यासाठी तयार असलेली कळंब शहरातील द्वारकानगरमध्ये राहत आसलेल्या महिलेची हत्या झाल्याचे कळतंय". या महिलेची ७ ते ८ दिवसापूर्वी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत, असेदेखील दमानिया यांनी म्हटले आहे.
या महिलेची हत्या नेमकी कोणत्या कारणाने झाली, अन् बीड पोलिसांना ही बातमी कशी कळाली, अन् ते घटनास्थळी पोहोचल्यावर नंतरच तेथील रहिवासी व स्थानिक पोलिसांना कळाली. अजून याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागू नये म्हणून ही हत्या झाली की अनैतिक संबधातून हत्या झाली? अशी चर्चा सध्या सुरू आहे, असेदेखील दमानिया यांनी म्हटले आहे.
या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करीत आहेत. असं असलं तरी शहर आणि परिसरात या घटनेने दहशत पसरली आहे. शहरातील द्वारकानगरीत राहणाऱ्या लोकांना २ दिवसांपासून उग्र वास येत होता. पण ज्या घरातून वास येत होता त्या घराला बाहेरून कुलूप लावलेले होते. दरवाजा तोडून बीड पोलीस व स्थानिक पोलीसानी आत प्रवेश केल्यानंतर संबंधित महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना आढळला. मृतदेह सडलेला आसल्यामुळे जागेवरच मृतदेहाचे शवविच्छेदन केले आणि अंत्यविधीही उरकला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत, असेही अंजली दमानिया म्हणल्या.
संबंधित मृत महिला अनेक पुरुषांना अडकवण्याचे काम करायची. यासाठी ती "मनीषा आकुसकर आडस, मनीषा बिडवे कळंब, मनीषा मनोज बियाणी कळंब, मनीषा राम उपाडे अंबाजोगाई आणि मनीषा संजय गोंदवले रत्नागिरी अशा नावांचा वापर करत असल्याचेदेखील अंजली दमानिया यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.