

Soybeans rotted due to continuous rain; Farmers face double sowing crisis!
मनोज गव्हाणे
नेकनूर : मे महिन्यात सुरू झालेल्या पावसामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यातच बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग केली. प्रामुख्याने सोयाबीनला प्राधान्य दिले, मात्र पावसाच्या दमदार आगमनामुळे अनेक ठिकाणी पेरलेले सोयाबीन कुजले, पावसाच्या जोराने दबून उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. नेकनूर परिसरातील अनेक शेतकऱ्यांना सोयाबीनची दुबार पेरणी करावी लागली आहे.
मे महिन्यात जोरदार बरसलेल्या पावसाने शेतकऱ्यांना मशागतीच्या कामांना वेळ मिळाला नाही. थोडीशी सवड होताच शेतकऱ्यांनी मशागतीला वेग देऊन पेरणीची लगबग केली. नेकनूर परिसरातील कापूस लागवड पूर्णपणे गायब झाली असून सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पहायला मिळते.
सोयाबीन पेरणी करताना शेतकऱ्यांनी विविध कंपन्यांच्या बॅगा सोबत घरच्या बियाणाला प्रधान्य दिले. मात्र पेरणीनंतर जोराचा पाऊस लागून राहिल्याने अनेक ठिकाणी बियाणे उगवले नाही जमिनीतच सडले यामुळे अनेक क्षेत्रावर दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली. बियाणे -खत वाया गेल्याने शेतकऱ्यांना पेरणीतच मोठा फटका बसला आहे.
दुबार पेरणीचे तरी सोयाबीन उगवावे या आशेवर शेतकरी आहे. गतवर्षी उगवलेले सोयाबीन गोगलगायीच्या संकटात सापडले होते यावर्षी पेरणीतच पावसाने सोयाबीन उगवणीला अडचण निर्माण केली.पाच तारखेला दोन एकर सोयाबीनची पेरणी केली मात्र लागलीच मोठ्या पावसाने पेरलेले सोयाबीन जमिनीच्या वर येऊ शकले नाही ते कुजले त्यामुळे पुन्हा पेरणी करावी लागली यामुळे पेरणीचा खर्च वाढला. सोयाबीनचे भाव शासनाने वाढवावेत तरच या पिकातून काही पदरात पडेल.