

Satisfactory rainfall has not yet arrived in the Takarvan area and its surroundings
टाकरवन, पुढारी वृत्तसेवा : जून महिना संपला तरी टाकरवन सह परिसरात समाधानकारक पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. त्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला असून शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. वेळेत मशागतीची सर्व कामे पूर्ण करून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला आता केवळ आभाळाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली आहे.
यंदा मान्सून वेळेत दाखल होईल आणि पेरण्यांना वेग येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, परिसरात केवळ तुरळक सरी कोसळल्याने जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी अद्याप पेरणीच केली नसून, ज्यांनी धाडस करून पेरणी केली आहे त्यांच्यावर आता दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गावागावातील पारावर आणि शेतकऱ्यांच्या बैठकीत सध्या एकाच विषयाची चर्चा सुरू आहे-"पाऊस कधी पडणार?" प्रत्येक दिवसागणिक पाऊस लांबत असल्याने खरीप हंगामाचे नियोजन विस्कळीत होत आहे.
हवामान विभागाने २१ जूननंतर पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार काही भागात हलक्या सरी कोसळल्या. या पावसावर विश्वास ठेवून अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिकांची पेरणी केली. मात्र, त्यानंतर पावसाने पुन्हा पाठ फिरवल्याने जमिनीतील ओलावा टिकला नाही. त्यामुळे उगवण धोक्यात आली असून अनेक ठिकाणी दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता आहे. जोरदार पाऊस न झाल्यामुळे परिसरातील नदी, नाले आणि तलाव अद्यापही कोरडे आहेत. विहिरी व बोअरवेलच्या पाणीपातळीतही घट होत असल्याचे चित्र दिसत आहे.