बीड : दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त श्री संत मुक्ताबाईंची पालखी तापीतीर ते भिमातीर श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथून १८ जूनला विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जाण्यासाठी निघाली आहे. ही पालखी मलकापूर, बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, जालना, अंबड, शहापूर, वडीगोद्री, आदी मुक्काम करत टाळ मृदंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करत आश्वासह सोमवारी (दि.१) बीड जिल्ह्यात दाखल झाली.
पहिल्या दिवशी मुक्काम गेवराई येथील चिंतेश्वर संस्थान येथे मुक्कामी असून दुसऱ्या दिवशी २ जूलै सकाळी सहा वाजता प्रस्थान होऊन सकाळी जय भवानी सहकारी साखर कारखाना, संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पाडळसिंगी येथे मुक्कामी पोहचेल. ३ जुलै रोजी सकाळी नऊ वाजता जाहीर पाटील विद्यालय नामलगाव फाटा येथे विसावा घेऊन तीन ते चार पर्यंत बीड येथील हनुमान मंदिर माळवेस येथे मुक्कामासाठी पोहोचणार आहे. ४ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता बालाजी मंदिर नवरंग मित्र मंडळ, दत्तात्रय नलावडे देवा यांच्याकडे मुक्काम व ५जुलै अहीर वडगांव, पाली मुक्काम, करून सकाळी नऊ वाजता पुढे चौसाळा, पारगाव, कुंथरगिरी, भूम, जवळा, शेंद्री, माढा आष्टी मार्गे अनुक्रमे मुक्काम करत पंढरपूर येथे पोहोचणार आहे.
दरम्यान हा पालखी सोहळा जिल्ह्यात दाखल झाला असून भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थांचे अध्यक्ष भैय्यासाहेब, अॅड. रवींद्र पाटील, सोहळा प्रमुख ह. भ. प. रविंद्र महाराज हरणे यांनी केले आहे. पुजारी म्हणून सुधाकर पाटील (निवृत्त सचिव) मुरलीधर सांबारे हे सेवा देत आहेत. या पालखी सोहळ्यात श्री संत मुक्ताबाईंचा प्रचार प्रसार करण्यासाठी दररोज सकाळी काकडा भजन, प्रवचन, कीर्तन, नाम जप, भारुड रुपीसेवा ह भ प रवींद्र महाराज, संतीकाका महाराज, विजय महाराज, विशाल महाराज, नितीन महाराज, सुनील महाराज, लखन महाराज, दीपक महाराज, संदीप महाराज, रामेश्वर महाराज व इतर महाराज मंडळी सेवा देत आहेत.
या पालखीचा रथ ओढण्यासाठी पांढरी शुभ्र बैल जोडी आहे. वारकऱ्यांच्या सेवेसाठी संस्थांनचे दोन वाहने सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव व विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत छत्रपती संभाजी नगर तर्फे स्वतंत्र पाणी पुरवठा टँकर, जळगाव जि प चे आरोग्य पथक सेवा देत आहेत. पालखी मार्ग मुक्कामाच्या हद्दीतील संबंधित पोलीस बांधव व त्यांचे हायवे कर्मचारी पालखी मार्ग मुक्कामाच्या ठिकाणी परिश्रम घेत आहेत.
हा सोहळा यशस्वीतेसाठी अध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा प्रमुख ह भ प रवींद्र महाराज हरणे, विनायक हरणे उद्धव जुनारे देखरेख करत असून संचालक मंडळ ट्रस्टी कर्मचारी भाविक भक्तगण परिश्रम घेत आहेत. पालखीमध्ये खानदेश विदर्भ मराठवाडा व राज्याच्या इतर भागातून मध्य प्रदेश मधून वारकरी सहभागी झालेले आहेत. दरम्यान हा पालखी सोहळा जिल्ह्यात ठिकठिकाणी मुक्कामी असून भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.