आळंदी : पुढारी वृत्तसेवा :
तुला साद आली तुझ्या लेकरांची
अलंकापुरी आज भारावली,
वसा वारीचा घेतला पावलांनी
आम्हा वाळवंटी तुझी सावली,
गळाभेट घेण्या भिमेची निघाली
तुझ्या नामघोषात इंद्रायणी..!
आळंदीकरांचा निरोप घेत माउलींची पालखी रविवारी (दि. ३०) सकाळी सहाच्या सुमरास पुण्याकडे मार्गस्थ झाली. यावेळी सर्व आळंदीकर आपल्या माऊलींना निरोप देताना भारावले होते. महिनाभराचा दुरावा ठेवत माऊली पुण्याकडे मार्गस्थ झाली. माउलींची साद घेत वाहत असणारी इंद्रायणी चंद्रभागेला गळाभेट घेण्यासाठी जोरदारपणे वाहत असल्याचे आज काहीसे चित्र होते.
हरिनामाच्या गजरात शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास पालखीचे प्रस्थान झाले होते. तद्नंतर ती पहिल्या मुक्कामासाठी नवीन दर्शनबारी मंडपात दाखल झाली होती. सकाळी नित्य धार्मिक विधी उरकत शितोळे सरकार यांच्या वतीने नैवेद्य दाखविल्यानंतर पालखी सहाच्या सुमारास पुण्याकडे मार्गस्थ झाली. यावेळी रस्त्यांच्या दुतर्फा भाविकांनी पालखी दर्शनासाठी गर्दी केली होती. वारकऱ्यांसाठी पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी चहा, नाष्टा व फळे उपलब्ध करून देत वारीत आपला सहभाग नोंदवला.
नागरिक माऊलींला निरोप देण्यासाठी पालखी सोहळ्यात सहभागीसकाळी दहाच्या सुमारास पालखी विसाव्यासाठी थोरल्या पादुका मंदिर भोसरी फाटा साईमंदिर येथे विसावली. येथे समाज आरती घेण्यात आली. तदनंतर पालखी दुपारच्या विसाव्यासाठी फुलेनगरकडे रवाना झाली. चऱ्होली, वडमुख वाडी, चोवीसावाडी, दिघी मँगझिन, साई मंदिर आदी भागातील नागरिकांसह पंचक्रोशीतील मोशी, डुडुळगाव, चिंबळी, कुरुळी, मोई, केळगाव, मरकळ, सोळु, धानोरे, गोलेगाव आदी गावांतून नागरिक माऊलींना निरोप द्यायला पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.