

धारूर : किल्ले धारूर शहराची ऐतिहासिक ओळख असलेल्या महादुर्ग किल्ल्यालगतच्या खारी दिंडीच्या चादरीकडे जाणाऱ्या मार्गावर वाढलेल्या बाभळी व इतर उपद्रवी वनस्पती हटवून रस्ता मोकळा करण्यात आला. कायाकल्प फाउंडेशन, किल्ले धारूर यांच्या पुढाकारातून जेसीबीच्या साहाय्याने गुरुवारी हा स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे अनेक दिवसांपासून बाभळी व गवतामुळे अडथळा निर्माण झालेला मार्ग पुन्हा नागरिकांसाठी खुला झाला आहे.
महादुर्ग किल्ला हा किल्ले धारूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहे. किल्ल्यालगत असलेल्या खारी दिंडीच्या चादरी परिसरालाही ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्व आहे. सुमारे सहा वर्षांपूर्वी कायाकल्प फाउंडेशनच्या वतीने या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात वाढलेले उपद्रवी गवत, बाभळी व इतर वनस्पती हटविण्यात आल्या होत्या.मात्र, कालांतराने परिसरात पुन्हा मोठ्या प्रमाणात बाभळी व काटेरी झुडपे वाढली.
विशेषतः खारी दिंडीच्या चादरीकडे जाणाऱ्या मार्गावर बाभळींची वाढ झाल्याने नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले होते. काही ठिकाणी तर काटेरी झुडपांमुळे मार्ग जवळपास बंदच झाला होता. त्यामुळे या मार्गाची स्वच्छता करून तो पुन्हा वापरण्यायोग्य करण्याची गरज निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन कायाकल्प फाउंडेशनच्या वतीने जेसीबीच्या साहाय्याने मार्गावरील बाभळी, काटेरी झुडपे व इतर उपद्रवी वनस्पती हटविण्याचे काम हाती घेण्यात आले.
गुरुवारी दुपारी 12 ते 3 या कालावधीत सलग तीन तास जेसीबीच्या साहाय्याने स्वच्छता करण्यात आली. मोठ्या प्रमाणात वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे अवघड झालेले काम यंत्राच्या साहाय्याने अल्पावधीत पूर्ण करण्यात आले. हेच काम श्रमदानातून केले असते तर सहा ते सात रविवार लागले असते; मात्र जेसीबीच्या मदतीमुळे अवघ्या तीन तासांत मार्ग मोकळा करण्यात आला.
या स्वच्छता मोहिमेमुळे खारी दिंडीच्या चादरीकडे जाणारा मार्ग आता अधिक सुलभ व सुरक्षित झाला आहे.
फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक
या उपक्रमात कायाकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष दिनेश कापसे, रामेश्वर गुळवे, सचिन चिद्रवार, योगेश महाजन, प्रशांत सुपेकर, श्रीकृष्ण महाजन यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. ऐतिहासिक महादुर्ग किल्ल्यालगतच्या परिसराची स्वच्छता करून नागरिकांसाठी मार्ग मोकळा केल्याबद्दल कायाकल्प फाउंडेशनच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी अशा प्रकारचे सातत्यपूर्ण उपक्रम आवश्यक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.