Help farmers in Maharashtra like Punjab: Shiv Sena leader Uddhav Thackeray
बीड पुढारी वृत्तसेवा : पंजाब सरकारने तेथील शेतकऱ्यांना कालबद्ध मर्यादा मर्यादेमध्ये मदत जाहीर केली आहे ती एकरी पन्नास हजार रुपये आहे. पंजाब सारखे राज्य ५० हजार रुपये देऊ शकत असेल तर महाराष्ट्राने द्यायला काहीच हरकत नाही. आम्हाला याच्यामध्ये राजकारण देखील करायचं नाही असे स्पष्ट मत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. गुरुवारी बीड मधील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावेळी उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी बीड मधील कुर्ला भागात पूरग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी झालेले नुकसान त्यांना दाखवत मदतीसाठी प्रयत्न करण्याची मागणी केली यावेळी उद्धव ठाकरे यांनी देखील शेतकऱ्यांचे हे नुकसान मोठे वेदनादायी आहे हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला आहे.
अशा स्थितीत सरकारने मदत करावी अशी मागणी केली. माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की अजितदादा म्हणतात आम्ही लाडक्या बहिणी वरती ४५ हजार कोटी रुपये खर्च करतो, ही मस्तीची भाषा आहे. दीड हजार रुपयात बहिणीचे घर सावरले जाणार आहे का? इथे शेतकऱ्यांचे सर्वच वाहून गेले आहे.
विद्यार्थ्यांचे वह्या पुस्तके देखील वाहून गेले आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांना बँकाच्या नोटिसा यायला लागल्यात परंतु या विरोधात आम्ही ठामपणे उभे राहणार आहोत. शेतकऱ्यांना जर बँकाच्या नोटीस आल्या तर त्यांनी त्या शिवसेना कार्यालयात आणून द्याव्यात, आम्ही संबंधित बँकेला जाब विचारू असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
आम्ही केलेली कर्जमुक्ती शेतकरी आणखीही विसरले नाहीत, अशाच कर्जमाफीची आज गरज आहे परंतु सरकार मात्र त्याबाबत निर्णय घेत नाही हे दुर्दैव आहे. आज शेतकऱ्यांसमोर संकट आहे परंतु शेतकऱ्यांनी आत्महत्या सारखा विचार मनात आणू नये आम्ही ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. कर्जमाफीसाठी सरकार म्हणते योग्य वेळी निर्णय घेऊ आता काय पंचांग बघून योग्य वेळ सांगणार आहात का ?
असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला शेतकऱ्यांची मागणी जर सरकारने पूर्ण केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा देखील उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. आमचे पंतप्रधानाकडे मागणे आहे की महाराष्ट्रातील शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याची जबाबदारी घ्या अन्यथा मोठे आंदोलन उभारावे लागेल असे देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटले. ठाकरे यांच्या या दौऱ्या वेळी शिवसेना नेते संजय राऊत, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, यांच्यासह उल्हास गिराम, गणेश वरेकर यांच्यासह शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.