

Female student ends her life due to study-related stress
अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा :
अंबाजोगाई शहरातील सावता माळी चौक परिसरात राहणाऱ्या एका बारावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. १०) रात्री घडली असून शनिवारी सकाळी उघडकीस आली.
पूनम मेघराज दहिफळे (वय १७) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती मूळ उमरेवाडी (ता. धारुर) येथील रहिवासी होती. शिक्षणासाठी ती अंबाजोगाई येथे भाड्याच्या खोलीत राहत होती. प्राथमिक माहितीनुसार, अभ्यासाच्या तणावातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, गेल्या आठवड्यात अशा प्रकारच्या तिसऱ्या-चौथ्या घटना समोर आल्याने पालकवर्गात मोठी चिंता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांवर वाढता शैक्षणिक ताण, स्पर्धा आणि अपेक्षांचे ओझे यामुळे मानसिक तणाव वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. एकूणच, वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पालकांनी मुलांशी संवाद वाढवून त्यांना मानसिक आधार देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
मानसोपचार तज्ञांचा इशारा
विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा तणाव हा केवळ शिक्षणापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो भावनिक आणि मानसिक पातळीवरही परिणाम करत आहे. आई-वडिलांच्या मुलांकडून अपेक्षा अनेकदा अतिरेक ठरत आहेत. त्यातच कुटुंबातील संवाद मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. गप्पा मारणे, अडचणी शेअर करणे हे धावपळीच्या आयुष्यात हरवत चालले आहे. त्यामुळे मुलं एकटी पडत असून अशा घटना घडताना दिसत आहेत, असे मत मानसोपचार तज्ञ डॉ. रेखा ढेरे घोलप यांनी व्यक्त केले