

बीड : बीड शहरातील अनेक वर्षांपासून धूळ खात पडलेली सिध्दीविनायक कॉम्प्लेक्स समोरील भाजी मंडई इमारत आता वापरात आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजी विक्रेते आणि नगर परिषद प्रशासनामध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार विजयसिंह पंडित यांनी स्वतः हस्तक्षेप करत संबंधित ठिकाणांची पाहणी केली आणि पालिका प्रशासनाला कडक शब्दांत सूचना दिल्या.
सोमवारी आ. पंडित यांनी नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजी मंडई, सिद्धिविनायक कॉम्प्लेक्ससमोरील भाजी मंडई इमारत तसेच जिव्हाळा बेघर निवारा केंद्राची पाहणी केली. यावेळी भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
भाजी मंडई इमारतीत स्वच्छता, वीज, पाणी आणि इतर मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून इमारत वापरात आणण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी पालिका प्रशासनाला दिले. “फक्त इमारती उभारणे नव्हे तर त्या लोकांच्या वापरात आणणे महत्त्वाचे आहे,” असे सांगत शहर विकासासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजी मंडई परिसरातील ओटे आणि शेडची दुरवस्था पाहूनही त्यांनी नाराजी व्यक्त केली. भाजीपाला विक्रेते आणि फळ विक्रेत्यांनी नियोजित जागेवर बसावे, यासाठी आवश्यक सुविधा देण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.दरम्यान, जिव्हाळा बेघर निवारा केंद्राला भेट देत आ. पंडित यांनी तेथील निराधार यांच्याशी संवाद साधला. भविष्यात बेघरांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
इमारती उभारून उपयोग नाही, त्या लोकांच्या कामी आल्या पाहिजेत : आ. विजयसिंह पंडित
भाजी विक्रेते, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुलभ सुविधा मिळणे गरजेचे आहे. शहरात कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या भाजी मंडई इमारती धूळ खात पडून राहणे योग्य नाही. प्रशासनाने तातडीने या इमारती वापरात आणाव्यात. नागरिक आणि विक्रेत्यांनीही सहकार्य केल्यास बीड शहरासाठी आदर्श भाजी मंडई उभी राहू शकते,” असे मत आ. विजयसिंह पंडित यांनी व्यक्त केले.या पाहणी वेळी नगराध्यक्ष प्रेमलता पारवे, उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, मुख्याधिकारी शैलेश फडसे, नगरसेवक, व्यापारी प्रतिनिधी तसेच पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.