

Decisions regarding the alliance will be made at the local level.
बीड, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसची बीड जिल्ह्याची आढावा बैठक पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पार पडली. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीविषयी प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेतले. युतीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याबाबतचा सूर या बैठकीतून दिसून आला.
बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे. तीन विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे असून इतर मतदारसंघातही दिग्गज नेते राष्ट्रवादीत असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेत विजय मिळवण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, आ.धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आ. विजयसिंह पंडित, आ.प्रकाश सोळंके, आ. विक्रम काळे, माजी आमदार संजय दौंड, कल्याण आखाडे, भागवत तावरे, राजेश्वर चव्हाण, डॉ. योगेश क्षीरसागर, अविनाश नाईकवाडे, शेख तय्यब, बळीराम गवते, राजेंद्र राऊत, अरम नाईकवाडे, मोईन मास्टर, फारुक पटेल, शेख निजाम, बप्पासाहेब घुगे आदींची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी बीड जिल्ह्यातील परिस्थितीवर भाष्य करत निवडणुकीविषयीची आपली मते व्यक्त केली.
काही ठिकाणी भाजपासोबत युती योग्य राहील तर काही ठिकाणी स्वबळावर लढण्याची भूमिका यावेळी दिसून आली. आगामी निवडणूकीत महिलांना प्राधान्य दिले जावे अशी भूमिका महिला आघाडीच्या बीड जिल्हाध्यक्षा प्रज्ञा खोसरे यांनी मांडली. तसेच ज्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या ताब्यात नगरपालिका, पंचायत समिती येऊ शकते, अशा ठिकाणी विशेष लक्ष देण्याबाबतची भूमिका मांडण्यात आली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी परळीत झालेल्या कार्यक्रमात आ. धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघात भाजपासोबत युती केली जाऊ शकते, त्याबाबत मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा सुरु असल्याचे सांगितले होते. परंतु उर्वरित मतदारसंघाबाबत मात्र त्या ठिकाणच्या नेत्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाऊ शकतो.