

Bull craze among rural youth due to race
उदय नागरगोजे
बीड : मला पैसे कमवाचे असते तर मी बजरंगला विकून पंधरा वीस लाख रुपये सहज मिळवले असते.. पण आपला जीव जडलाय त्याच्यावर... त्याने मला राज्यात ओळख मिळवून दिली... बजरंगचा मालक म्हणून मला आज अनेकजण ओळखतात, हीच ओळख माझ्यासाठी मोठी आहे... मी त्याला कोणत्या शर्यतीत पैशासाठी पळवत नाही... शर्यतीत त्याला मारतही नाही... गाडीला जुंपल्यानंतर तो पळतो अन् जिंकतोही...
बैलगाडा शर्यतीमुळे ग्रामीण तरुणाईत बैलांची क्रेझ वाढत आहे... अशाच काही तरुणांपैकी एक असलेल्या सोनीमोहा येथील जय तोंडे त्याच्याकडच्या बजरंग या वैलाबद्दल भरभरून बोलत होता... त्याने तीन वर्षांपूर्वी एक बैल विकत आणला.. त्याचे नाव बजरंग ठेवले... हा बजरंग आजवर पन्नास शर्यतीत धावला.. त्यातील वीस ते पंचवीस शर्यतीत गुलाल उधळला...
सुरुवातीला मेहनत घ्यावी लागली तेव्हा आता तो शर्यतीत जिंकतोय... पण पैशासाठी मी त्याला पळवत नाही.. शर्यतीत त्याला एकदा गाडीला जुंपले की जोरात काठी सुद्धा मारत नाही... त्याचा तोच सोबतच्या बैलाला घेऊन पळतो अन् गुलाल देखील उधळतो असे जय तोंडे सांगत होता.. जणू काही हा बैल म्हणजे त्याचे सर्वस्व असल्याचे त्याच्या बोलण्यातून जाणवत होते...
बैलगाडा शर्यतीचे झालेल्या बाजारीकरणावरही त्याने नाराजी व्यक्त केली.. सातारा भागात सर्व नियम पाळून शर्यती लावल्या जातात. त्या शर्यतीत एकदा धावलेल्या बैलजोडीला पुन्हा संधी मिळत नाही.. यामुळे बैल जखमी होण्याचा धोकाही कमी होतो, आपल्याकडे मात्र असे नियम पाळले जात नसल्याची खंतही जयने व्यक्त केली.. आजवर बजरंगने अनेक शर्यती जिंकल्या, बक्षीसही मिळवले, पण त्याला शर्यतीला घेऊन जायचा, त्याच्या खुराकाचा खर्च मोठा आहे. खिशातूनही पैसे टाकावे लागतात.. घरचे अनेकदा ओरडतात पण मी मात्र कोणाचं ऐकत नाही असं सांगत माझं या बैलावर खूप प्रेम असल्याचे जयने सांगितले..
बैलगाडा शर्यतीचा नाद कसा काय लागला, या प्रश्नावर तो भरभरुन बोलला.. पुणे जिल्ह्यातील मुळशी येथील बकासुर नावाच्या बैलाने मला या शर्यतीचे वेड लावले... या शर्यतीतील विजयाचं गणित या बकासुर नावाच्या बैलाने समजून घेतलंय अन् तो ज्या शर्यतीत धावतो तिथे जिंकतोच असे जय म्हणाला..
त्याच्यामुळेच मला हा नाद लागला, तो आता काही सुटणार नाही असेही जय तोंडे याने सांगितले... जयच्या या बजरंगचे फे सबुक, इन्स्टाग्राम पेजही आहे आणि त्याच्या व्हिडिओला मिलीयनमध्ये व्ह्युज असल्याचे जयने सांगितले...! एकीकडे वाढत्या यांत्रिकीकरणामुळे बैलबारदाना सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली असताना शर्यतीमुळे ग्रामीण तरुणाईत बैलांची क्रेझ मात्र वाढताना दिसत आहे.
शर्यतीत धावणाऱ्या या बैलांची नावही तेवढीच वेगळी आहेत.. वडवणी तालुक्यातील विशाल बडे या तरुणाच्या बैलाचे नाव लक्ष्या ५५५ आहे. या लक्ष्या ५५५ ने चार महिन्यांत तब्बल अडीच लाख रुपयांची बक्षिसे मिळवले आहेत. त्याच्या जोडीला आजवर सर्जा फोर बाय फोर, शंभु १२९६, लक्ष्या १२१२, म्हाळसापूरचा बादशहा अशी हटके नावे असलेले बैल पळाल्याचे विशालने सांगितले.. शर्यतीत पळणाऱ्या य बैलांना वर्षभर कोणते काम नसते... शर्यतीचा हंगाम सुरू झाला तेवढेच काय ते काम या बैलांना असतं... काही मालक या बैलांना दररोज काजू बदाम खाऊ घालतात अन् दूध देखील प्यायला देतात असे विशालने सांगितले. मी मात्र उपलब्ध होईल तो खुराकच खाऊ घालतो असेही तो म्हणाला.