

Beed : Villagers angry as bodies have to be carried through water for cremation
शंकर भालेकर
शिरूर : "मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते.. कवी सुरेश भटांच्या कवितेच्या या ओळीची आठवण आर्वी गावात घडलेल्या दुःखद घटनेनं समोर आली... आर्वी गावात घडलेली घटना मात्र जिवंत माणसाच्या हृदयाला चिरणारी आहे. मृत्यूनंतरही मृतदेहाला शांती नाही, तर अंत्यसंस्कारासाठीसुद्धा तारेवरची कसरत करावी लागतेय.
शिरूर तालुक्यातील आर्वी गावातील महादेव नन्नवरे यांचे शुक्रवारी रात्री दुःखद निधन झाले. पण त्यांच्या अंत्यविधीला गेलेली गावभरची मंडळी मात्र जणू एखाद्या आपत्तीशी झुंज देत होती. गाव उथळा नदीच्या एका तिरावर आणि स्मशानभूमी दुसऱ्या तिरावर असल्याने, मृतदेह खांद्यावर घेऊन मांडीइतक्या पाण्यातून नदी पार करत गावकऱ्यांनी मृतदेह स्मशानभूमीत नेला. या दृश्याने प्रत्येक गावकऱ्याच्या मनात वेदनेचा आणि संतापाचा स्फोट झाला.
नदीतून वाहणाऱ्या पाण्यात दगड-खड्डे असताना, मृतदेह खांद्यावर घेऊन चालणाऱ्या लोकांची अवस्था बघवणारी नव्हती. एखादा खांदेकरी घसरला असता तर अंत्ययात्रा शोकांतिकेतच परिवर्तीत झाली असती, अशी भीती प्रत्येकाला वाटत होती. तरीही गावकऱ्यांनी जीव मुठीत धरून नदी पार केली. चिखल, प्रवाह आणि असहायता या सर्वांवर मात करून त्यांनी अंत्यविधी पार पाडला. पण हे आर्वीकरांसाठी नवे नाही दरवर्षी अशाच कसरतीला तोंड द्यावे लागते, हे त्यांचे कटू वास्तव आहे.
आर्वी ग्रामपंचायतीच्या सरपंच मीरा यादव व ग्रामसेवक संतोष सानप यांनी या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले. उथळा नदीला यावर्षी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रवाहाने पाणी वाहत आहे. महादेव नन्नवरे यांच्या अंत्यविधीवेळी ओढवलेली परिस्थिती अत्यंत दुर्दैवी आहे. हा प्रश्न वारंवार निर्माण होत असल्याने स्मशानभूमी आणि रस्त्याचे काम तातडीने सुरू व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
ही केवळ एक अंत्ययात्रा नव्हे, हा माणसाच्या सन्मानाचा, प्रशासनाच्या जबाबदारीचा आणि गावांच्या विकासाचा प्रश्न आहे. जेव्हा जिवंतपणी माणूस रस्त्याशिवाय जगतो आणि मरणानंतर त्याच रस्त्याशिवायच पाण्यातून शेवटचा प्रवास करावा लागतो, तेव्हा ही समाजव्यवस्थेची सर्वांत मोठी शोकांतिका ठरते. आता तरी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी आर्वीकरानी केली.