

Beed The bank froze the savings account of the victim farmer
शशी केवडकर
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरग्रस्तासाठी राज्याची तिजोरी रिकामी करू ही भूमिका घेत शेतकऱ्यांवर कर्ज भरण्यासाठी कोणत्याही बँकेने सक्ती करू नये असे आदेश दिले असताना या आदेशाला बीड जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांनी मात्र हरताळ फासली असून या आदेशाला चक्क केराची टोपली दाखवली असल्याचे सत्य समोर आले आहे.
आष्टी तालुक्यातील हरी नारायण, आष्टा येथील रामभाऊ सांगळे या शेतकऱ्याची महापुरात शेतातल्या मातीसह सर्व काही वाहून गेले, डोळ्यासमोर नेटाने उभारलेला संसार पाण्यात वाहून गेला, पिके गेली, जनावरं गेली, घरांची पडझड झाली. राहिले फक्त त्यांचे कुटुंब. अशी परिस्थिती या गावातील अनेक कुटुंबाची झाली. रामभाऊ यांचे भारतीय स्टेट बँकेत एक कर्जाचे खाते तर एक बचत खाते. या बचत खात्यात त्यांनी पोटाला चिमटा घेवून काही शिल्लक बाजूला काढून ठेवली होती, जिकी अडचणीच्या वेळी कामाला यावी म्हणून परंतु आज त्यांच्यावर जेव्हा निसर्ग कोपला आणि त्याचं सगळच हिरावून घेतल तेव्हा त्यांनी ही बाजूला काढलेली शिल्लक कामाला येईल या भावनेने बँकेत गेले असता त्यांना सांगण्यात आले कि तुमचे कर्ज थकबाकी मध्ये आहे त्यामुळे तुमचे बचत खाते हे फ्रीज केले आहे. त्यातून पैसे काढता येणार नाही.
पोटाला चिमटा काढून अडचणीसाठी ठेवलेले पैसे हेही काढता येत नाही हे ऐकल्यावर त्यांना अजूनच धक्का बसला. आता काय खायचं, कसे दिवस काढायचे हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला. त्यांनी बँकेतील अधिकारी यांना साहेब सगळ गेल हो अशी आर्त विनंती केली तेवढे तरी द्या त्यावरच आता जगण आहे अशी गयावय केली. मात्र त्या अधिकार्याला काहीच फरक पडला नाही उलट थकबाकी मुले तुम्हाला नोटीस काढली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्रालयातून काढलेले मदतीचे आदेश, कारवाई न करण्या बाबतच्या सूचना ह्या फक्त बातम्या मधूनच आहेत कि काय अशी शक्यता आता वाटत असून मुख्यमंत्री दररोज पूरग्रस्तांन दिलासा देण्यासाठी बैठका वर बैठका घेत आहे, दिल्लीच्या वाऱ्या करत आहेत तर दुसरीकडे जिल्हा पातळीवर पूरग्रस्तांचे अशा पद्धतीने शोषण हे सुरूच आहे.