

बीड ः धुलिवंदन साजरा करण्यासाठी रिसॉर्टवर जाणाऱ्या तरूणांच्या कारला भिषण अपघात झाल्याची घटना सोमवार (दि.2) रोजी पहाटे बीड-शिरूर रोडवरील नागऱ्याचीवाडी येथे घडली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार तीन-चार पलट्या घेत एका विहीरीच्या कठड्याला जाऊन धडकली.
या अपघातात बीड शहरातील युवक जागीच ठार झाला असुन त्याच्यासोबतचे अन्य तीन मित्र गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास छत्रपती संभाजीनगर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कठड्याला धडकल्यामुळे कार जागीच थांबली अन्यथा विहीरीत कोसळून मोठा अनर्थ घडला असता.
कृष्णा जालिंदर मुळे (वय 22, रा.रामतिर्थ, बीड) असे अपघातत ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. कृष्णा मुळे हा तरुण आपल्या मित्रांसोबत धुलिवंदन साजरा करण्यासाठी पर जिल्ह्यातील रिसॉर्टवर जात होते. व्हेरना आणि थार अशा दोन गाड्यांमधुन हा मित्र परिवार बीडहून शिरूर कासारमार्गे जात असतांना नागऱ्याचीवाडी येथे व्हेरना कारमधील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार तीन-चार पलट्या घेत शेतातील विहीरीच्या कठड्याला जाऊन धडकली. या अपघातात कृष्णा जालिंदर मुळे (वय 22) याचा जागीच मृत्यु झाला तर प्रसाद खोले, यश पेंढारे व अन्य एक असे तिघेजण गंभीर जखमी झाले.
त्यांच्यासोबतची थार गाडी पाठीमागे असल्याने त्यांनी तात्काळ जखमींना बाहेर काढले. जखमींपैकी प्रसाद खाले याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रूग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले.तर यश पेंढारे व अन्य एकावर बीडच्या खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.