

Beed News: Tension over payment for Upali railway bridge; allegations of irrigated land being shown as dry land
वडवणी, पुढारी वृत्तसेवा : वडवणी तालुक्यातील उपळी सर्कल परिसरात सुरू असलेल्या रेल्वे ब्रिज प्रकल्पासाठी होत असलेल्या जमीन संपादनात मोबदल्यावरून वाद निर्माण झाला असून, बागायती जमिनीची नोंद कोरडवाहू म्हणून केल्याचा आरोप संबंधित शेतकऱ्याने केला आहे. योग्य मोबदल्याची मागणी केल्यानंतर पोलिसांकडून दबाव आणण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला असून, या प्रकरणात मानवी हक्क अभियानाने हस्तक्षेप करत शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी लढा देण्याची भूमिका जाहीर केली आहे.
उपळी येथील शेतकरी रामेश्वर राठोड यांच्या शेतातून रेल्वे ब्रिजचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी त्यांच्या शेतातील काही भाग संपादित करण्यात येत असून, त्यामध्ये फळझाडे आणि शेतीचे मोठे नुकसान होणार आहे. मात्र महसूल व भूमी अभिलेख विभागाच्या नोंदीत संबंधित जमीन बागायतीऐवजी कोरडवाहू दाखविण्यात आल्याने मोबदल्यात मोठी तफावत निर्माण झाल्याचा आरोप राठोड यांनी केला आहे.
राठोड यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या शेतात मागील दहा वर्षांपासून सुमारे 20 फळझाडे असून, विहीर आणि सिंचनाच्या सुविधेमुळे ही जमीन प्रत्यक्षात बागायती स्वरूपाची आहे. शासनाच्या नियमानुसार बागायती जमिनीला आणि फळझाडांना अधिक मोबदला मिळणे अपेक्षित असताना, प्रत्येक झाडासाठी केवळ 20 हजार रुपयांचा मोबदला देण्याची तयारी प्रशासनाने दर्शविल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, या वादामुळे घटनास्थळी काही काळ तणाव निर्माण झाला. यावेळी वडवणी पोलिसांनी आपल्यावर दबाव आणत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोपही राठोड यांनी केला आहे. या घटनेची माहिती मिळताच मानवी हक्क अभियानाचे जिल्हाध्यक्ष विष्णू मुजमुले यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली.