

Beed News: MLA Munde's troubles increase in the 'Jagmitra' case
बीड, पुढारी वृत्तसेवा : अंबाजोगाई तालुक्यातील नियोजित जगमित्र साखर कारखान्यासाठी शेतकऱ्यांची जमीन घेऊन पैसे न दिल्याप्रकरणी आमदार धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने काही दिवसांपूर्वी त्यांना दिलेला दोषमुक्ततेचा निर्णय अंबाजोगाई सत्र न्यायालयाने रद्द ठरवला असून, हे प्रकरण (खटला) पुन्हा चालवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, मुंडे यांच्या वकिलांनी विनंती केल्यानुसार वरिष्ठ न्यायालयात अपील करण्यासाठी या आदेशाला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील पूस व तळणी शिवारातील शेतकरी मुंजा किशनराव गिते यांची जमीन २०११-१२ मध्ये नियोजित जगमित्र शुगर मिल्ससाठी खरेदी करण्यात आली होती. हा व्यवहार ५० लाख रुपयांत ठरला होता. यावेळी धनंजय मुंडे, वाल्मीक कराड आणि सूर्यभान मुंडे यांनी जमिनीच्या मोबदल्यासह कुटुंबातील एकाला कारखान्यात नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते.
व्यवहारापोटी गिते यांना रोख १० लाख रुपये मिळाले, मात्र उर्वरित ४० लाख रुपयांचा दिलेला धनादेश बँकेत वटला नाही (बाऊन्स झाला). त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी धनंजय मुंडे व इतरांविरुद्ध फसवणुकीचा (कलम ४२० सह इतर) गुन्हा दाखल केला.
सत्र न्यायालयाने खटला पुन्हा चालवण्याचे आदेश दिल्यानंतर, आ. धनंजय मुंडे यांचे वकील अॅड. कवडे यांनी वरिष्ठ न्यायालयात अपील करण्यासाठी मुदत देण्याची विनंती अर्जाद्वारे केली. न्यायालयाने ही विनंती मान्य करत, अपील दाखल करेपर्यंत खटला चालवण्याच्या प्रक्रियेस स्थगिती दिली आहे. त्यामुळे मुंडे यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.