

Kej Police Inspector fine
गौतम बचुटे
केज : दुचाकीवर प्रवास करताना स्वतःच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरणे अत्यंत गरजेचे आहे. अनेक शासकीय व निमशासकीय कर्मचारी सुद्धा हेल्मेट वापर करीत नसल्याने केज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उनवणे यांनी वाहतूक शाखेचे पोलिस हवालदार यांना एक हजाराचा दंड ठोठावला.
रस्ते अपघातात दुचाकी स्वारांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याने दुचाकी स्वार आणि पाठीमागे बसलेला या दोघानीही हेल्मेट घालणें अनिवार्य आहे. त्या संदर्भात त्याची अंमलबजावणी सुरू आहे.
सोमवारी (दि. २०) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास केज पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे हे पोलिस ठाण्याच्या आवारात असताना त्याच वेळी वाहतूक शाखेचे हवालदार हे विना हेल्मेटचे मोटार सायकलवर येत असल्याचे दिसताच स्वामील उणवणे यांनी त्यांना एक हजारा चा ऑनलाईन दंड देऊन त्याचे ई चालान फाडले.
भारतात रस्ते अपघातांचे प्रमाण अत्यंत चिंताजनक असून, हेल्मेट न वापरणे हे दुचाकीस्वारांच्या मृत्यूचे प्रमुख कारण बनले आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या आकडेवारी नुसार, दरवर्षी ५०,००० हून अधिक दुचाकीस्वारांचा जीव जातो, ज्यामध्ये बहुतेकजण हेल्मेट वापरत नाहीत.
डोक्याला गंभीर इजा :- हेल्मेट न घातल्याने अपघातात डोक्याला गंभीर दुखापत होते, जे मृत्यूचे मुख्य कारण आहे.
२०२२ मधील आकडेवारी :- देशात झालेल्या दुचाकी अपघातांपैकी ५०,००० पेक्षा जास्त मृत्यू हे हेल्मेट न घातल्यामुळे झाले आहेत.
तरुणांचा मृत्यू :- अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांपैकी ६६.४ टक्के (सुमारे १,१४,०००) लोक हे १८ ते ४५ वयोगटातील आहेत.
पिलियन रायडर (मागे बसणारे) :- अनेकदा चालक हेल्मेट घालतात पण मागे बसणारा घालत नाही. महाराष्ट्रात २०२० मध्ये २,६२५ पिलियन रायडर हेल्मेट न वापरल्यामुळे जखमी झाले होते.
महाराष्ट्रात ३५,००० हून अधिक रस्ते अपघातात १५,००० हून अधिक जण जीव गमावतात. रायगड जिल्ह्यात तीन वर्षांत २२५ हून अधिक दुचाकीस्वारांचा मृत्यू हेल्मेटअभावी झाला आहे.
हेल्मेटचे महत्त्व :- योग्य दर्जाचे हेल्मेट वापरल्याने अपघातात मृत्यूची शक्यता ६ पटीने कमी होऊ शकते आणि डोक्याला होणाऱ्या इजांचा धोका ७४ टक्क्यांनी कमी होतो.
कठोर पावले :- वाढत्या मृत्यूंमुळे पोलीस 'नो हेल्मेट, नो राईड' मोहीम राबवत आहेत, ज्यामध्ये हेल्मेटशिवाय पेट्रोल न देणे आणि दंड आकारणे समाविष्ट आहे.
शहरी आणि ग्रामीण भागात दुचाकीस्वारांकडून हेल्मेट वापरण्याचे प्रमाण अत्यंत असमान आहे, ज्यामध्ये शहरांमध्ये हे प्रमाण अधिक आणि ग्रामीण भागात अत्यंत नगण्य असल्याचे दिसून येते.
मेट्रो शहरे व मुख्य शहरेः मुंबई व नागपूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक दुचाकीस्वार हेल्मेट वापरतात.
पुणे, नाशिक सारख्या इतर शहरांमध्ये ही टक्केवारी कमी आहे. तर ग्रामीण भारत अनेक ठिकाणी हे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे आढळले आहे.
जिथे कडक पोलीस कारवाई आणि दंडात्मक कारवाई केली जाते, तिथे हेल्मेट वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. चालक हेल्मेट घालत असले तरी, मागे बसणारी व्यक्ती हेल्मेट वापरत नसल्याचे प्रमाण शहरातही जास्त आहे.
ग्रामीण भागात हेल्मेट वापराचे प्रमाण :- ग्रामीण भागात हेल्मेट वापरण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. ग्रामीण किंवा नगरपालिका रस्त्यांवर हेल्मेट न वापरण्याचे प्रमाण जास्त आहे.
कारणे :- ग्रामीण भागात पोलिसांची तपासणी कमी असणे, जनजागृतीचा अभाव आणि प्रवासाचे अंतर कमी असणे ही प्रमुख कारणे आहे.
१ जानेवारी २०२६ पासून नवीन दुचाकी खरेदी करताना दोन BIS-प्रमाणित हेल्मेट देणे विक्रेत्यांना बंधनकारक करण्यात आले आहे.
तसेच ४ वर्षां पेक्षा जास्त वयाच्या मुलाला मागे बसवल्यास, लहान हेल्मेट घालणे आणि दुचाकीचा वेग ४० किमी/तास पेक्षा जास्त न ठेवणे आवश्यक आहे.
हेल्मेट सक्ती व वापरा संबंधी कारवाई तीव्र करण्यात येणार असून दुचाकीस्वारांनी आणि शासकीय व निम्न शासकीय कर्मचाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल.
- स्वप्नील उनवणे, पोलिस निरीक्षक, केज