

Rajshri Umre Patil hunger strike ends
गौतम बचुटे
केज : कोरडेवाडी साठवण तलावासह विविध मागण्यांसाठी सुरू असलेले राजश्री उमरे पाटील यांचे आमरण उपोषण अखेर सोळाव्या दिवशी आज (दि.२०) संपुष्टात आले. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी लेखी स्वरूपात कारवाईचे पत्र देत मागण्यांचा विचार होणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. ३ ऑक्टोबरपासून राजश्रीताई उमरे पाटील या धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानतर्फे कोरडेवाडी येथे उपोषणाला बसल्या होत्या.
कोरडेवाडी साठवण तलावासाठी पाण्याचे प्रमाणपत्र देणे,
अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ५० हजारांची मदत,
ज्ञानराधा बँकेच्या मालमत्तेचा लिलाव करून ठेवीदारांना पैसे परत करणे,
शेतकऱ्यांची कर्जमाफी,
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फी माफी
या मागण्यांवर १७ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात राजश्रीताई, बाळराजे आवारे पाटील, कार्यकर्ते आणि गावकऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर १८ ऑक्टोबरला जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईसंबंधी लेखी पत्र दिले. त्यात कोरडेवाडी परिसरात ३ ते ४ साखळी साठवण तलावांच्या स्थळ निश्चितीसाठी सर्वेक्षण पथक गठित करून ७ नोव्हेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात संबंधित बैठकीचे आयोजन होणार आहे. याशिवाय ज्ञानराधा मल्टिस्टेट बँक प्रकरणी सक्षम प्राधिकारी नेमून विशेष न्यायालयात कार्यवाही सुरू असल्याची माहिती देण्यात आली. या लेखी आश्वासनानंतर नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड यांच्या हस्ते पाणी पिऊन राजश्री उमरे पाटील यांनी उपोषण मागे घेतले.
कोरडेवाडीत भावनिक वातावरण
राजश्री उपोषण सोडताच ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रू तरळले. महिलांनी हंबरडा फोडला. त्यांना ॲम्ब्युलन्समधून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
या आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी तहसील कार्यालयात बैलगाडी जाळणे, तलावात उतरून जलसमाधी आंदोलन, तसेच सहा तासांचा रस्ता रोको अशा तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबला होता. काही आंदोलकांनी आत्मदहन आणि विषप्राशनाचाही प्रयत्न केल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली होती.