

बीड : बीड शहरातील जीर्ण आणि धोकादायक इमारतींमुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला असतानाही नगर परिषद प्रशासन, मुख्याधिकारी, नगररचनाकार आणि संबंधित यंत्रणा अद्यापही सुस्तच असल्याचे चित्र आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दुर्घटनेचा धोका वाढला असतानाही शहरातील धोकादायक इमारतींचे संरचनात्मक ऑडिट किंवा तपासणी सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे "सीईओ साहेब, एखाद्या मोठ्या दुर्घटनेनंतरच जाग येणार का?" असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
१० जुलै २०२६ रोजी नगर रोडवरील सुमारे ३० वर्षे जुन्या बावळे कॉम्प्लेक्समधील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम असलेल्या गाळ्याचा स्लॅब अचानक कोसळला होता. सुदैवाने त्या वेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेत गंजलेल्या लोखंडी सळ्या आणि बांधकामातील गंभीर त्रुटी उघड झाल्या होत्या.
एवढी गंभीर घटना घडूनही तब्बल महिनाभर उलटला तरी संबंधित इमारतीची संरचनात्मक तपासणी झालेली नसल्याची माहिती समोर येत आहे.या इमारतीत अनेक व्यापारी, दुकानदार आणि कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यामुळे भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दमदार पावसामुळे आधीच जुन्या इमारतींची अवस्था अधिक धोकादायक बनली आहे.
दरम्यान, शहरातील कोट्यवधी रुपयांच्या रस्ते विकास निधीच्या कामांवरून सत्ताधारी गटात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांनी वेगळेच चित्र निर्माण झाले आहे. या निधीत कोणाला किती वाटा मिळणार, यावरून नगरसेवक, पदाधिकारी आणि त्यांचे नेते उघडपणे एकमेकांवर आरोप करत असल्याचे दिसत आहे.
या राजकीय संघर्षात शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसारखे गंभीर प्रश्न मात्र पूर्णपणे बाजूला पडल्याची भावना व्यक्त होत आहे.रस्त्यांच्या कामांतील 'मलई'च्या वाटपासाठी राजकीय रस्सीखेच सुरू असताना जीर्ण इमारती, सार्वजनिक सुरक्षितता आणि नागरिकांच्या जीविताचा प्रश्न दुर्लक्षित राहिल्याने बीडकरांनी नेमकी अपेक्षा कोणाकडून ठेवायची, असा सवाल जनहितातून उपस्थित केला जात आहे.
तातडीने संरचनात्मक ऑडिटची मागणी
शहरातील सर्व जुन्या, जीर्ण आणि धोकादायक इमारतींचे तातडीने संरचनात्मक ऑडिट करण्यात यावे. धोकादायक ठरलेल्या इमारती रिकाम्या करून आवश्यक त्या इमारती पाडण्याची प्रक्रिया त्वरित राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडून निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त प्रश्न बीडकर विचारत आहेत.