

माजलगाव : राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे हे माजलगाव दौऱ्यावर आले असता शेतकरी नेत्यांनी त्यांना घेराव घालत विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. परभणी रोडवरील वसंतराव नाईक चौकात कृषीमंत्र्यांचा ताफा अडवून शेतकरी प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले.
यावेळी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकविमा मिळण्यात येणाऱ्या अडचणी, कर्जमाफी योजनेतील जाचक अटी तसेच लाभार्थी पात्रतेसाठी लावण्यात आलेल्या निकषांमुळे अनेक शेतकरी योजनांपासून वंचित राहत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या जाचक अटी तात्काळ रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
शेतकरी नेत्यांनी मागील काही वर्षांपासून सततच्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे सांगितले. पिकांचे नुकसान, वाढलेला उत्पादन खर्च आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढत असून शासनाने तातडीने दिलासा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी प्रतिनिधींकडून निवेदन स्वीकारून संबंधित मागण्यांबाबत शासनस्तरावर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती शेतकरी नेत्यांनी दिली.