

गोविंद खरटमोल
अंबाजोगाई : एके काळी अंबाजोगाई शहर हे शांत, संयमी तथा सांस्कृतिक शहर म्हणून सर्वदूर परिचित होते. मात्र कालानुरूप शहराची ही ओळख जणू पुसली जाते की काय असा यक्षप्रश्न समोर उभा राहू लागला आहे. आजची तरुणाई ही सोशल मीडिया तथा अन्य व्यसनाच्या बेधुंद तालामुळे गुन्हेगार प्रवृत्ती कडे वाटचाल करताना आढळून येऊ लागली आहे. अशीच घटना बुधवार संध्याकाळी शहरातील ट्यूशन एरियात घडली आहे. बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर तीघानी जीवघेणा हल्ला केल्याचे निदर्शनास आले आहे.
याबाबत घडलेली सविस्तर घटना अशी की अंबाजोगाईतील ट्युशन एरियात अभ्यासिका संपवून रूमवर परतणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यावर तिघांनी लाकडी दांडक्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी (दि. १७) मध्यरात्री घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आशिष विनोद माने (वय १७, रा. रेपेवाडी, सध्या माळीनगर, अंबाजोगाई) याच्यावर लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
अंबाजोगाई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आशिष हा अभ्यासिका संपवून पायी रूमकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या साहिल मांदळे, जीतू मांदळे व एका अल्पवयीन आरोपीने त्याला अडवून शिवीगाळ केली. त्यानंतर एका आरोपीने लाकडी दांडक्याने त्याच्या डोक्यावर जोरदार वार केला. डोक्यावर झालेल्या वारामुळे आशिष गंभीर जखमी झाला. या हल्ल्यानंतर तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
त्यानंतर जखमी आशिषला स्थानिकांच्या मदतीने प्रथम उपचारासाठी अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी लातूर येथे हलविण्यात आले. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम १०९, ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वशिष्ठ कागणे हे करत आहेत. घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने कारवाई करून साहिल मांदळे, जीतू मांदळे आणि एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले.
या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या व ट्युशन एरियातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नियमित पोलीस गस्त वाढवून गुंड प्रवृत्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पोलीस व कायदा न जुमाननाऱ्या अशा बेधुंद तरुणाईला कायद्याचा धाक दाखवून अंबाजोगाई शहराची पूर्वीची शैक्षणिक व सांस्कृतिक शहराची ओळख अबाधित ठेवण्याची संबंधीची मागणी शहरातील सुजाण नागरिक तथा पालकांच्या वतीने केल्या जात आहे.