

गेवराई : चार महिन्याच्या चिमुकल्या मुलाला पाण्याच्या बॅरलमध्ये टाकून वडिलांनी जीवन संपवल्याची दुदैवी घटना गेवराई तालुक्यातील तलवाडा जवळील रामनगर याठिकाणी पहाटे सुमारास घडली. कौटुंबिक कलह किती भयंकर रूप धारण करू शकते, याचे उदाहरण ज्वलंत उदाहरण समोर आले असून समाजमनाला हादरवणारी आहे.
गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील रामनगर भागात घडलेली ही हृदयद्रावक घटना संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करणारी ठरली आहे. पती-पत्नीतील वादातून हतबल होऊन अमोल हौसराव सोनवणे (वय ३०) यांनी आपल्या केवळ चार महिन्यांचा मुलगा पाण्याच्या बॅरलमध्ये टाकले. बॅरलमध्ये पाणी असल्याने चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर अमोल यांनी स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरील घटना दिनांक ३ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारास चार वाजता घडली. यावेळी अमोलची पत्नी पायल झोपेत होती. सकाळी घडलेला हा प्रकार उघडकीस आला तेव्हा घरात हळहळ आणि धक्क्याचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, मृत अमोल सोबतच चार महिन्यांच्या बालकाचे शवविच्छेदनासाठी तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती समजताच तलवाडा ठाण्याचे सपोनि मनोज निलंगेकर, पोलिस उपनिरीक्षक. कैलास अनालदास, बीट अंमलदार पो.ह. शेख मोहसिन, पो.ह. नारायण काकडे तसेच चालक पवन शेळके यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.