

Attempted kidnapping of two sisters in Majalgaon
माजलगाव पुढारी वृत्तसेवा :
माजलगाव शहरातील वर्दळीच्या परिसरात भरदुपारी घडलेल्या धक्कादायक घटनेत दोन बहिणींना जबरदस्तीने चारचाकीत टाकून अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला. प्रसंगावधान राखत नागरिकांनी तत्काळ पाठलाग करून संशयितांची कार आंबेडकर चौक येथे अडवली आणि दोन्ही तरुणींना सुरक्षित बाहेर काढत तिन्ही संशयितांना वाहनासह पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी माजलगाव शहर पोलिस ठाणे येथे तिघांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अंबाजोगाई माहितीनुसार तालुक्यातील दोन बहिणी उपचारासाठी माजलगावात आल्या होत्या. दवाखान्यातील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या बाहेर येताच पांढऱ्या रंगाची चारचाकी त्यांच्या जवळ येऊन थांबली. वाहनातील एका युवकाने दरवाजा उघडून एका तरुणीला जबरदस्तीने आत ओढले. त्यानंतर इतर दोघांनी दुसऱ्या तरुणीलाही जबरदस्तीने कारमध्ये बसवून दरवाजे लॉक केले आणि वाहन वेगाने धारूर रोडच्या दिशेने निघाले.
घटनेदरम्यान कारमधून सुरू झालेल्या आरडाओरडीमुळे परिसरातील नागरिकांचे लक्ष गेले. काहींनी तातडीने पाठलाग सुरू केला. दरम्यान, तरुणींसोबत आलेल्या नातेवाइकानेही संशयित वाहनाचा माग काढत पाठलाग केला. नागरिकांच्या वेगवान हालचालीमुळे कार आंबेडकर चौक येथे अडवण्यात आली. जमलेल्या गर्दीने दोन्ही तरुणींना सुरक्षित बाहेर काढले. संशयितांना घटनास्थळीच पकडून वाहनासह पोलिसांकडे सोपवण्यात आले.
या प्रकरणातील आरोपींची नावे दिनेश पुरुषोत्तम देवकते (रा. येल्डा, ता. अंबाजोगाई), रवींद्र विभीषण निळे (रा. चौथे वाडी, ता. अंबाजोगाई) आणि मजरूह सिकंदर सय्यद (रा. चौथेवाडी, ता. अंबाजोगाई) अशी आहेत. तिघांविरुद्ध अपहरणाच्या प्रयत्नासंदर्भात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.
आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी
या गुन्ह्यातील आरोपी दिनेश पुरुषोत्तम देवकते (रा. येल्डा, ता. अंबाजोगाई), याच्या विरुद्ध यापूर्वी देखील अंबाज-ोगाई पोलिस स्थानकात विविध गुन्हे दाखल असून आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडला असल्याचे सुरुवातीच्या माहितीवरून दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे माजलगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. दिवसाढवळ्या दवाखान्यासमोर घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, अशा संवेदनशील ठिकाणी सुरक्षा आणि गस्त यंत्रणा कितपत प्रभावी आहे, यावरून पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची चर्चा शहरभर रंगली असून, सार्वजनिक ठिकाणी पोलिसांची दृश्यमान उपस्थिती वाढवावी, अशी मागणी होत आहे.