

Ahilyanagar-Beed-Parli railway line Deputy Chief Minister Ajit Pawar
बीड, पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यात नियोजित विमानतळासाठी जमीन देणे, मोजणी करणे, पशुवैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी, परळी अहिल्यानगर रेल्वेमार्ग आणि जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्हीसीद्वारे दिनांक २५ जून रोजी घेतला. या कामांच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करून उर्वरीत कामाबाबत पाठपुरावा करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रशासनाला दिले.
या बैठकीसाठी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, उपमुख्यमंत्री महोदय यांचे सचिव राजेश देशमुख, बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन व इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी जिल्ह्यामध्ये चालू असलेल्या महत्त्वाच्या कामांची सद्यस्थिती नमूद केली.
बीड येथील नियोजित विमानतळासाठी मौजे कामखेडा, दगडीशहाजानपूर व आहेर चिंचोली या गावातील ११७.०४ हेक्टर शासकीय जमीन व १९१.२८ हेक्टर खासगी अशी एकूण ३०८.३२ हेक्टर जमीन प्रस्तावित करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी बीड यांनी या जागेची पाहणी केली आहे.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीमती स्वाती पांडे यांनी ही जागा विमानतळासाठी सुयोग्य आहे का, हे तपासण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रपत्र १ मध्ये माहिती मागवून घेतली आहे. तसेच याबाबतच्या तपासणीसाठी जिल्हा प्रशासनाकडे रुपये ४०.३२ लक्ष इतका निधी प्राप्त झाला आहे.
अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या कामांमध्ये प्रामुख्याने रेल्वे विभागाकडून माजलगाव, बीड व परळी उपविभागामध्ये एकूण १३ गावांमध्ये नव्याने राहिलेल्या क्षेत्राचे भूसंपादनाचे प्रस्तावांतर्गत संयुक्त मोजणीच्या तारखा जून महिन्याच्या शेवटच्या व जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निश्चित करण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी नमूद केले. त्या अनुषंगाने सदर मोजणीची कार्यवाही नेमलेल्या तारखेस पूर्ण करावी व त्यानंतर अंतिम निवाड्याची कार्यवाही जलद गतीने पूर्ण करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनास केल्या.
सदर रेल्वे मार्ग कार्यान्वित करण्याच्यादृष्टीने ट्रॅक्शन सबस्टेशन आष्टी येथील कामाचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये सदर रेल्वे लाईनवरील २३ पैकी १७ मनोऱ्यांचे काम महापारेषणमार्फत करण्यात आले आहे, उर्वरित ४ मनोऱ्यांचे काम प्रगतीपथावर असून १५ जुलैपर्यंत सदर काम पूर्ण करण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.