बीड : तहसीलदारांची विद्युत मोटर जप्तीची कारवाई; गावकऱ्यांचा विरोध, आमदारांची मध्यस्‍थी | पुढारी

बीड : तहसीलदारांची विद्युत मोटर जप्तीची कारवाई; गावकऱ्यांचा विरोध, आमदारांची मध्यस्‍थी

माजलगाव ; पुढारी वृत्‍तसेवा तालुक्यातील महातपुरी सुलतानपूर येथील गोदावरी नदीवर पाणी उपश्यासाठी बसवलेल्या मोटारी काढण्यावरून गावकरी आणि तहसीलदारात आज (बुधवार) पहाटे मोठा राडा झाला. या दरम्यान आख्या गावाने एक होत सुमारे पाच तास तहसीलदारांचा ताफा रोखून धरला होता. या आणीबाणीच्या प्रसंगी आ.प्रकाश सोळंके यांनी गावकऱ्यांची समजूत काढत मध्यस्थी करून तहसीलदारांना सुखरूप बाहेर काढले.

गतवर्षी पावसाळा कमी झाल्याने जिल्ह्यात पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याची जपवणूक करण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. यातच शेतीसाठी नदीकाठ गंगा काठावरून केला जाणारा पाण्याच्या उपशावरही नियंत्रण ठेवणे सुरू केले आहे. याच कामासाठी माजलगावच्या तहसीलदार वर्षा मनाळे आपल्या ताफ्यासह महादपुरी येथे गंगा काठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी नदीवर असणाऱ्या विद्युत मोटरी काढण्यास सुरुवात केली.

दरम्यान या बाबीचा गावकऱ्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली. दिवस-रात्र नदीतून होणारा वाळू उपसा आपल्याला दिसत नाही. मात्र शेतकरी आपल्या शेतीसाठी थोड पाणी घेत असेल तर आपण आडवे येता. वाढता विरोध होत असल्याने तहसीलदारांनी पोलिसांचा मोठा फौज फाटा यावेळी बोलावून घेतला. विरोध होत असल्याने पोलिसांकडून काही वयोवृद्ध शेतकऱ्यांना मारहाण करण्यात आली अशी माहिती येथील उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितली. यामुळे गावकऱ्यात आणि तहसीलदार यांच्यात मोठा वाद निर्माण झाला. पहाटे 6 वाजल्यापासून महिला, पुरुष, आबालवृद्ध गावकऱ्यांनी तहसीलदारांच्या गाडीला गोदा पात्रातच अडवून धरले होते. यावेळी मोठा राडा सुरू झाला. दरम्यान या घटनेची माहिती आ.प्रकाश सोळंके यांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गावकऱ्यांची समजूत काढली आणि मध्यस्थी करत तहसीलदारांना बाहेर काढले.

सुशील सोळंके, जयदत्त नरवडे यांची मध्यस्थीची भूमिका महत्त्वाची ठरली.

तहसीलदारांनी गोदापात्रात सुमारे 30 ते 40 विद्युत मोटर जप्त करण्याची कार्यवाही चालू होती. अगोदरच शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत आहेत. ही बाब लक्षात घेता पंचायत समितीचे माजी उपसभापती सुशील सोळंके व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त नरवडे यांनी शेतकऱ्यांची बाजू लावून धरली. तहसीलदारांना विनंती केली. प्रसंगी कठोर ही झाले.

परंतु ते ऐकत नसल्याचे पाहून आमदारांना फोन केला. शेतकऱ्यांच्या जप्त होणाऱ्या मोटार वाचवल्या. त्यामुळे येथील शेतकरी वर्गातून त्यांचे कौतुक होत आहे.

हेही वाचा : 

Back to top button