पुढारी ऑनलाईन डेस्क: आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली युवा संघर्ष यात्रा सुरू आहे. गेवराई येथील जातेगाव येथे ही यात्रा पोहचली आहे. दरम्यान त्यांनी येथील गोदाबाई यांची भेट घेत, त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यानंतर त्यांनी साहेब, व्यथा समजण्यासाठी केवळ सोन्याचा चमचा घेऊन जन्मन्याचा संबंध नसतो, असा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. या संदर्भातील पोस्ट रोहित पवार यांनी सोशल मीडियावर केली आहे. (Maharashtra Politics)
आमदार रोहित पवार यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, साहेब, व्यथा समजून घेण्यासाठी सोन्याचा चमचा घेऊन जन्मने अथवा साधा चमचा घेऊन जन्मने याचा काही संबंध नसतो. तर लोकांच्या व्यथा समजण्यासाठी केवळ प्रामाणिकपणा आणि संवेदना गरजेच्या असतात. त्यामुळे प्रामाणिकपणा आणि व्यथा आपल्याकडे देखील असतीलच असे समजून गोदाबाई यांच्या कुटुंबाच्या व्यथा आपण सोडवाव्यात ही विनंती करतो. तसेच शासन आपल्या दारीचे मोठमोठे कार्यक्रम – इव्हेंट करून, योजनेत 'आपल्या दारी' नाव असेल म्हणजे शासन लोकांच्या दारी पोहचत नसते, असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून रोहित पवार यांनी म्हटले आहे. (Maharashtra Politics)
आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा गेवराई तालुक्यातील जातेगावातून जात असताना गोदाबाई यांची भेट झाली. त्यांच्या मुलाच्या ह्रदयाला होल आहे. मुलाचं ऑपरेशन कसं करायचा याचा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्याचे घर देखील पत्र्याचे आहे, पक्के घर नाही. गॅस आहे पण गॅस भरायला परवडत नाही म्हणून, गॅस कोपऱ्यात फेकून त्या चुलीवर स्वयंपाक करतात. टॉयलेट बांधला पण टाकी बांधली नाही, टॉयलेटचे अनुदान कोणीच परस्पर काढून नेले. तर दूध घ्यायला परवडत नाही म्हणून त्या नातवंडांना बिना दुधाच्या चहामध्ये पाव खायला देतात. या माउलीच्या अशा एक ना अनेक प्रश्नांनी माझ्यासह उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आलं, असे रोहित पवार यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.