नेकनूर, मनोज गव्हाणे : विजयादशमीच्या मुहूर्तावर राज्यातील अनेक साखर कारखान्यांचे बॉयलर पेटणार असल्याने ऊसतोड मजुर निघण्याची तयारी करत आहेत. कारखान्यांचे बोलावणे आले असतानाही अनेक मजुरांना मात्र आठवडी बाजार बंद असल्याने बैलजोडीच्या शोधात फिरावे लागत आहे.
कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजूर जातात. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांमध्ये साखर कारखाने मुकादमा कडून मजुरांना उचल देऊन करार करतात. साखर कारखाने सुरू होण्यापूर्वी मजूर चार महिन्यांसाठी लागणाऱ्या धान्यांसह बैलांची खरेदी करून मार्गस्थ होतात. सध्या अनेक साखर कारखाने दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू होणार असल्याने मजुरही निघण्याची तयारी करत आहेत; पण अनेक मजूर मात्र बैलांच्या शोधात आहेत. लंम्पीमुळे जनावरांचे बाजार बंद असल्याने बैलजोडीच्या शोधात मजुरांना फिरावे लागत आहे.
ऊस वाहतूक करण्यासाठी मोठ्या बैलांची गरज असते, मात्र सध्या आठवडी बाजार बंद असल्याने बैलांचा शोध घेणे अवघड बनले आहे. त्यातच कारखान्याचे बोलावणे आले असून, चार दिवसात जावे लागणार आहे. त्यामुळे आता मिळतील तशी बैलजोडी घ्यावी लागेल.
-जगन्नाथ मुंडे, निवडुंगवाडी
हेही वाचा :