सोनपेठ, पुढारी वृत्तसेवा : चांगले काम करताना चांगला अधिकारी मिळत नाही आणि मिळाला तर खराब लोकप्रतिनिधीमुळे तो टिकत नाही. तसेच चांगले काम करणारा अधिकारी तत्काळ बदली करून घेतो. त्यामुळे चांगले अधिकारी टिकवण्यासाठी लोकांनी मतदान करताना पैसे घेऊ नये, असे आवाहन आदर्श गाव पाटोद्याचे माजी सरपंच भास्करराव पेरे यांनी केले. ते सोनपेठ येथील समाजप्रबोधन कार्यक्रमात बोलत होते.
पेरे पाटील म्हणाले, लोकांना शिस्त लावण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या तर लोकांना आपोआप शिस्त लागेल. ज्या देशात पाऊस पडत नाही त्या देशात १३२ मजल्यावर बेसिंगमध्ये पाणी येते. महाराष्ट्रात गावे वाहून जात असताना नळाला पाणी येत नाही. हे सर्व अधिकारी आणि बोगस लोकप्रतिनिधींमुळे घडत असल्याचा आरोप पेरे पाटील यांनी केला.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी आंचल गोयल,उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी,प्रभारी तहसीलदार प्रकाश गायकवाड,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष पवार,युवा नेते सुमित पवार,आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी करत स्वच्छ सोनपेठ सुंदर सोनपेठचा संकल्प करण्याचे आवाहन शहरवासीयांना केले. यावेळी आझादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमाच्या आयोजनाचे थिम्स व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थितांनी पाहून बालाजी वांकर, ज्ञानेश्वर ढमढेरे,सुभाष कदम,डॉ.बालाजी पारसेवार,अनिल कवटीकवार यांच्यासह आदींच्या प्रयत्नातून श्री रंगनाथ महाराज सोनपेठकर प्रतिष्ठाणच्या वतीने सामुहिक राष्ट्रगीत गायनाचे आयोजन करण्यात आले होते.