छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अनेक पक्षातील निष्ठावान पदाधिकाऱ्यांचा त्या त्या पक्षात त्यांचा कोंडमारा होत आहे. अनेक पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते यांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. १८ मार्चरोजी सर्व चित्र स्पष्ट होईल, असा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आज (दि.१६) पत्रकार परिषदेत केला. Sanjay Shirsat
शिवसेनेच्या ठाकरे गटासह इतर पक्षांतही अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांचा कोंडमारा होत आहे. नवीन आलेले पदाधिकारी, नेते हे जुन्या जाणत्या निष्ठावानांना कमी लेखत असल्याने ही धुसफूस वाढली आहे. त्यांचा पक्षात मोठ्या प्रमाणात कोंडमारा होत असल्याचे अनेकांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. त्यांना आम्ही योग्य तो सन्मान देऊ शकतो, याची खात्री असल्यानेच ते आमच्याकडे येण्यास तयार आहेत. दरम्यान, कोणत्या पक्षातील कोणता पदाधिकारी, नेता येणार यासाठी तुम्हाला आणखी एक दिवस वाट पाहावी लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. Sanjay Shirsat
विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे शिंदे गटाकडून लोकसभा लढवणार अशी चर्चा सुरू आहे. यावर भाष्य करताना शिरसाट यांनी दानवे यांना त्यांच्या पक्षात अस्वस्थता जाणवत असेल. त्यांनी खुशाल यावे, याचा निर्णय आमचे पक्षप्रमुख घेतील, असे म्हणत यावर जास्त बोलण्याचे त्यांनी टाळले. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरची जागा ही शिवसेनेलाच (शिंदे गट) सुटणार असून त्यासाठी चार जण इच्छुक आहेत. यातील दोघांच्या नावाबाबत अद्याप काहीच बोलणार नसल्याचे सांगत दानवेबाबत अप्रत्यक्ष संकेत दिल्याची चर्चा दिवसभर सुरू होती.
संजय राऊत स्वत:ला कडवट सैनिक असल्याचे सांगत सुटतो. परंतु, राहुल गांधींच्या सभेनिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवर साधे उद्धव ठाकरे यांचा फोटा लावलेला नाही. याचाच अर्थ राऊत उद्धव ठाकरे यांना नेता मानतच नाही. ठाकरे गटाचे आता दिवस फिरले असून त्यांच्यावर किती जण राहतील, याचीच त्यांना गॅरंटी नसल्याचा टोला त्यांनी लगावला.
हेही वाचा