छत्रपती संभाजीनगर: पैठणमध्ये कृषी सेवा केंद्रे बंद, रब्बी हंगामाची कामे ठप्प
पैठण, पुढारी वृत्तसेवा: पैठण येथील नाथसागर धरणातून शेतीच्या रब्बी हंगामासाठी कालव्यात पाणी सोडले आहे. मात्र, कृषी केंद्रांच्या आंदोलनामुळे तालुक्यातील जवळपास २०० हून अधिक कृषी सेवा केंद्र बंदमध्ये सहभाग झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे व किटकनाशके, रासायनिक खते खरेदी करण्यास अडचण येत आहे.
राज्य शासनाच्या प्रास्ताविक विधायक क्रमांक ४०, ४१, ४३ व ४४ अनुसार नवीन कायदा करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे हा कायदा तत्काळ रद्द करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र फर्टीलायझर्स पेस्टीसाईडस सीडस असोसिएशन यांनी दि.२ ते ४ नोव्हेंबर या कालावधीमध्ये कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पैठण तालुक्यातील जवळपास २०० हून अधिक कृषी सेवा केंद्रे बंद ठेवण्यात आली आहेत.
दरम्यान, पैठण येथील नाथसागर धरणातून रब्बी हंगामासाठी डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले आहे. परंतु, कृषी दुकाने बंद असल्याने शेतकऱ्यांना बियाणे, फवारणीसाठी कीटकनाशक, रासायनिक खतांचा तुटवडा जाणवू लागला आहे.
दरम्यान, शासनाने कृषी सेवा केंद्राबाबतचा प्रस्तावित कायदा तत्काळ रद्द करावा. अन्यथा आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असे कृषी सेवा केंद्र चालक रामेश्वर सुसे, जितेंद्र पांडे, ज्ञानेश्वर उगले, गोकुळ शिंदे, नामदेव शिरसाट, सुनील रावस, बाळासाहेब गजे, मनोज पहाडे, उमेश तट यांनी म्हटले आहे.
हेही वाचा