डोंगरकडा : पुढारी वृत्तसेवा हिंगोली : डोंगरकडा परिसरात अतिवृष्टी; स्वयंभू जटाशंकर मंदिर परीसरात घुसले पाणी
कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. शुक्रवार सायंकाळी सहा वाजता ढगफुटी झाली. त्यामुळे हजारो हेक्टर वरील कवळी पिके पाण्याखाली गेली. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
कयाधू नदीला महापूर आल्यामुळे परिसरात प्रसिद्ध असलेले श्री जटाशंकर मंदिर परिसरात पुराचे पाणी शिरले होते. मार्च एप्रिलमध्ये चक्रीवादळ झाल्यामुळे या भागातील प्रमुख पीक असलेले केळीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. यावेळी कृषिमंत्र्यांनी पाहणी केली, मात्र अद्याप कोणत्याच प्रकारची आश्वासने किंवा नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यातच काल झालेल्या पावसात सोयाबीन, तूर, उडीद, केळी, हळद या पिकांचे अचानक झालेल्या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ना त्या कारणामुळे या भागात शेतकऱ्यावर अनेक संकटे येत असून, शासन पीक विमा असो की नुकसान भरपाई असो याकडे डोंगरकडा परिसराकडे दुर्लक्ष झाल्याने आमच्यावर अन्याय झाल्याचे म्हणत शेतकरी वर्ग नाराज झाला आहे.
गुरूवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कळमनुरी तालुक्यातील एकही पुढारी किंवा शासकीय कर्मचारी या भागात फिरकला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पावसाने हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या भागातील शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा :