जालना: समृद्धी महामार्गावर कार अपघातात नागपूरचे ३ जण ठार | पुढारी

जालना: समृद्धी महामार्गावर कार अपघातात नागपूरचे ३ जण ठार

जालना, पुढारी वृत्तसेवा : मुंबई – नागपूर समृध्दी महामार्गावर भरधाव कार टँकरला पाठीमागून धडकली. या अपघातात ३ जण ठार तर १ जण गंभीर जखमी झाला. हा अपघात जालन्याजवळील निधोना परिसरात आज ( दि.९) दुपारी बारा च्या सुमारास झाला.

नागपूर येथील जगनाडे चौकातील मालुबाई पुरी, त्यांची मुलगी शांताबाई या दोघी गुरूवारी सायंकाळी रामोजी शिवराज तिजारे यांच्या कारने (एम एच 49 बी डब्ल्यू 0615) नगरकडे धार्मिक कार्यासाठी गेल्या होत्या. तेथील विधी आटोपून त्या नागपूरकडे परत जात होते. यावेळी आज दुपारी निधोना येथे त्यांची कार टँकरला पाठीमागून धडकली. यामध्ये रामोजी शिवराज तिजारे (वय 50), मालुबाई पुरी (वय 70)आणि शांताबाई पुरी (वय 45) हे तिघेजण जागीच ठार झाले.

दरम्यान रामोजी तिजारे यांचा मुलगा सुरज तिजारे (वय 30) हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर जालना सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुरी यांच्यामागे कोणताही परिवार नाही. पोलीस उपनिरीक्षक साखरे, एएसआय चाटे, पोलिस कर्मचारी बिजुले, बेडेकर, हावळे हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना अपघाताची माहिती मिळाली. कंटेनर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

हेही वाचा 

Back to top button