![परभणी: डीग्रस येथे तब्बल २८ तासांनंतर तलाठ्याचा मृतदेह सापडला](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F05%2Fdigras.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
जिंतूर; पुढारी वृत्तसेवा: वाळू माफियावर कारवाई करण्यासाठी गेले असता पाण्यात बुडून बेपत्ता झालेले तलाठी सुभाष होळ यांचा मृतदेह आज (दि.२६) दुपारी २.४५ वाजता सापडला. औरंगाबाद येथील पाणबुडी पथकाला तब्बल २८ तासांनंतर मृतदेह शोधून काढण्यास यश मिळाले. अशी माहिती सेलू उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांनी दिली.
जिंतूर तालुक्यातील डीग्रस येथे पूर्णा नदी पात्रात वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गुरूवारी (दि.२५) सकाळी साडे दहाच्या सुमारास तलाठी सुभाष होळ आणि तलाठी धनंजय सोनुने हे दोघे गेले होते. यावेळी पूर्णा नदी पात्राच्या दुसऱ्या काठावर ट्रॅक्टरच्या मदतीने यंत्र सामुग्रीने वाळू काढण्याचे काम सुरू असल्याचे त्यांना आढळून आले.
स्वतः तलाठी होळ मोठ्या हिंमतीने नदी पात्रात उतरले. व दुसऱ्या काठावर पोहत असताना बरेच अंतर कापल्यानंतर त्यांना दमछाक लागली. पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. या घटनेची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी वरिष्ठांना कळविली. घटनेचे गांभीर्य समजताच उपविभागीय अधिकारी अरुणा संगेकर, जिंतूर प्रभारी तहसीलदार परेश चौधरी, सेलूचे नायब तहसिलदार थारकर प्रशांत, तलाठी आष्टीकर मुकुंद, जिंतूरचे पोलीस उपनिरीक्षक विश्वास खोले घटनास्थळी पोहोचले.
आपले कर्तव्य बजावत असताना अशी दुर्घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मृत सुभाष होळ हे मूळचे सातारा जिल्ह्यातील होते. त्यांच्या पश्चात २ मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
हेही वाचा