जालना; पुढारी वृत्तसेवा : जालना शहरासह परिसरात आज (दि. 26) दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली. गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर शहरातील रस्त्यांवरील नागरिकांची एकच धांदल उडाली.
मंगळवारी जिल्ह्यातील अंबड तालुक्यात वडीगोद्री महसूल मंडळात वादळी वाऱ्यासह पाऊस होऊन मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती. हवामान खात्याने आज जालन्यासह जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली जात होती. दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणात ढग दाटून आले. शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली.
जोरदार झालेल्या गारपिटीमुळे द्राक्ष बागांसह भाजीपाला पिकांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अचानक सुरू झालेल्या गारपिटीमुळे शहरातील नागरिकांची एकच धांदल उडाली. तर काही ठिकाणी लहान मुलांनी एकत्र येऊन गारा गोळा करण्याचा आनंद लुटल्याचे दिसून आले.
हेही वाचा