नांदेड : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातील ९ भारतयात्री | पुढारी

नांदेड : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातील ९ भारतयात्री

नांदेड; संजीव कुळकर्णी : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील टप्पा सोमवारी देगलूर येथून सुरू झाला. या यात्रेतील भारतयात्रींमध्ये विविध राज्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नऊ कार्यकर्ते असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले.

भारत जोडो यात्रेचा साडेतीन हजार किलो मीटर अंतराचा कन्याकुमारी ते जम्मु काश्मीर पर्यंतचा प्रवास निश्चित झाल्यानंतर देशभरातील अनेक काँग्रेस कार्यकर्ते संपूर्ण यात्रेत सहभागी होण्यासाठी इच्छूक होते. पण सर्वांनाच सामावून घेणे शक्य नसल्याने प्रत्येक राज्यातून काही ठराविक कार्यकर्त्यांची निवड झाली. यामध्ये महाराष्ट्रातून नांदेड जिल्ह्यातील प्रदेश काँग्रेसचे सचिव डॉ. श्रावण रॅपनवाड यांची निवड झाली होती.

भारतयात्रींमध्ये नागपूर येथील महेंद्र वोहरा हे अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय सचिव तसेच नागपूरच्याच वैष्णवी भारद्वाज व पिंकी सिंघ यांचाही समावेश आहे. चंद्रपूर येथील एनएसयूआयचे बिट्टू रोशनलाल हेही दोन महिन्यांचा प्रवास करून नांदेड जिल्ह्यात आले आहेत. नाशिक येथील युवक काँग्रेसच्या अतिषा पैठणकर, पालघर येथील कॅप्टन सत्यम ठाकूर, रायगड जिल्ह्यातील नंदा म्हात्रे, नवी मुंबईतील डॉ. मनोज उपाध्याय हेही भारतयात्री आहेत.

नांदेड जिल्ह्यातील श्रावण रॅपनवाड यांची भारतयात्री म्हणून निवड झाल्याची माहिती यात्रा सुरू झाल्यानंतर समोर आली होती. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांचे निकटवर्ती म्हणून रॅपनवाड यांचा पक्षसंघटनेत प्रवेश झाला होता. तामिळनाडू मधून यात्रा सुरू झाल्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांनी यात्रेतील अनुभव समाजमाध्यमांतून व्यक्त केले होते. आपल्या कर्मभूमीत दाखल झाल्यानंतर रॅपनवाड यांनी मंगळवारी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्यासह अन्य महाराष्ट्रीयन भारतयात्रींसोबत फोटो घेतला.

हेही वाचा :

Back to top button