परभणी; प्रवीण देशपांडे : १९८९ च्या निवडणुकीत परभणी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे (Shivsena) प्रा. अशोक देशमुख हे निवडून आले आणि धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केले.
मुंबई सोडून शिवसेनेने (Shivsena) प्रथम औरंगाबादेत पाय रोवले होते. औरंगाबाद महापालिकेच्या १७ एप्रिल, १९८८ रोजी झालेल्या पहिल्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार धनुष्यबाणावरच लढले होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर झालेली सभा संपूर्ण राज्यभर गाजली होती. या निवडणुकीत शिवसेनेने आपले प्रभूत्व सिद्ध केल्यामुळे मराठवाड्यात सेनेचा वेगाने प्रसार झाला.
दरम्यानच्या काळात १९८९ मध्ये लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली. तेव्हा भाजपसोबत झालेल्या युतीच्या चर्चेत परभणीची जागा शिवसेनेला (Shivsena) सुटली. प्रा. देशमुख यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली. तोपर्यंत शिवसेनेला आयोगाकडून अधिकृत राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली नव्हती. शिवसेनेने उभे केलेले उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात होते. त्यात देशमुख यांनी धनुष्यबाण हे चिन्ह घेतले व ते ६६ हजारांवर मते घेत विजयी झाले. त्यामुळे आयोगाने त्यानंतरच्या निवडणुकांसाठी शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह बहाल केले. 89 च्या निवडणुकीत औरंगाबाद मतदारसंघातून मोरेश्वर सावे हे मशाल चिन्हावर शिवसेनेकडून निवडून आले. वामनराव महाडीक, विद्याधर गोखले असे अन्य दोन शिवसेना उमेदवार त्या निवडणुकीत विजयी झाले होते.
अधिक वाचा :