जालना : जांब समर्थ मूर्ती चोरीप्रकरणी रामभक्‍तांचे ठिय्या आंदोलन | पुढारी

जालना : जांब समर्थ मूर्ती चोरीप्रकरणी रामभक्‍तांचे ठिय्या आंदोलन

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा: घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथील श्रीराम मंदिरातील पंचधातूंच्या मूर्ती चोरी प्रकरणाला ९ दिवस उलटून गेले आहेत. तरीही तपास लागत नसल्याने मंगळवारी (दि.30) जांबसमर्थसह परिसरातील रामभक्तांनी आयोजित केलेल्या ठिय्या आंदोलनासाठी जाणार्‍या रामभक्तांना पोलिसांनी घनसावंगी येथील जुन्या बसस्थानकाजवळच रोखले. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावरच दोन तास ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.

चोरीचा तपास लागत नसल्याने ग्रामस्थांनी मंगळवारी ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार जांब येथील ग्रामस्थ सकाळी ११ वाजता संत रामदास कॉलेजपासून रामनामाचा जयघोष करत निघाले होते. यावेळी त्यांना शहरातील जुन्या बसस्थानकाजवळ पोलिसांनी रोखले. यावेळी संतप्त नागरिकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडून पोलिसांचा निषेध व्यक्त केला. या ठिय्या आंदोलनात सहभागी झालेले समर्थांचे अकरावे वंशज भूषण महारूद्र स्वामी यांनी राम नामाचा जप, भजन व अभंगाचे वाचन केले.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी ग्रामस्थांची भेट घेतली. दपोलीस अधीक्षकांनाही फोनद्वारे भूषण स्वामींशी संवाद साधला. आमचा तपास सुरू असून त्याची व्याप्ती आम्ही अजून वाढवणार आहोत  आम्हाला तपासासाठी कालावधी द्यावा. लवकरात लवकर गुन्हेगारांना पकडून शासन करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, माजी आमदार शिवाजीराव चोथे आणि पोलिसांची पोलीस ठाण्यासमोर बाचाबाची झाली. या चोरीची एसआयटी चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. जांब येथील महिलांनी चूलबंद आंदोलन करीत आंदोलनात सहभाग नोंदविला.

मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन

माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी जांबसमर्थ येथे भेट देऊन पाहणी केली. तसेच मुख्यमंत्र्यांशी समर्थ वंशज भूषण स्वामी यांचा संवाद घडवून आणला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपण पोलिसांच्या संपर्कात असून लवकरच आरोपींना पकडण्यात यश येईल, असे आश्‍वासन दिले. भूषण स्वामी यांनी पोलिसांनी तपासाची व्याप्‍ती वाढवावी, अशी मागणी केली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button