पाकविरुद्धच्या सामन्यानंतर कपिल देव यांचे मोठे विधान; म्हणाले, ‘हा भारताचा विजय नाही…’ | पुढारी

पाकविरुद्धच्या सामन्यानंतर कपिल देव यांचे मोठे विधान; म्हणाले, ‘हा भारताचा विजय नाही...’

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या रविवारी आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रोमहर्षक सामना झाला. ज्यात टीम इंडियाने शेवटच्या षटकात रोमांचक विजय मिळवला. भारतासमोर 148 धावांचे लक्ष्य होते, जे संघाने दोन चेंडू आणि 5 विकेट्स शिल्लक ठेवून पूर्ण केले. संघाच्या विजयात अष्टपैलू हार्दिक पंड्याने फिनिशरची भूमिका पार पाडली. त्याने अवघ्या 17 चेंडूंत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 33 धावांची नाबाद खेळी करून हतातून निसटलेला सामना जिंकून दिला. (kapil dev statement on india victory against pakistan)

भारताच्या विजयानंतर माजी विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, भारत-पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. उभय संघांच्या सामन्याकडे सार-या जगाचे लक्ष असते. भारत-पाकिस्ता सामना म्हणजे क्रीडा चाहत्यांना एक वेगळीच पर्वणी असते. दोन्ही संघ विजय मिळवण्यासाठी जीवाचे रान करतात. तसेच चाहत्यांनाही आपापला आवडा संघ जिंकावा असे वाटत असते. पण या महामुकाबल्यात जो संघ विजयी ठरतो, हा त्या केवळ संघाचाच विजय नसतो तर ‘क्रिकेट’चा असतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. (kapil dev statement on india victory against pakistan)

ते पुढे म्हणाले, ‘रविवारी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला हे सत्य आहे. पण मी एवढेच म्हणेन की त्या सामन्यात क्रिकेट जिंकले आहे, भारत किंवा पाकिस्तान नाही. सामना खरोखरच छान झाला. माझ्या मते दोन्ही संघांनी अप्रतिम खेळ केला. विजेत्या संघाला अधिक आनंद मिळतो, तर पराभूत संघ पुढील सामन्यात चांगली कामगिरी करण्याची तयारी करतो, यात शंका नाही’, अशीही भावना कपिल देव यांनी व्यक्त केली. (kapil dev statement on india victory against pakistan)

पाकिस्तान संघाला 20 षटकेही खेळता आली नाहीत…

भारत विरुद्ध पाकिस्तान या हाय व्होल्टेज सामन्याची सुरुवात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून केली. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत पाकिस्तानचा डाव 19.5 षटकांत 147 धावांवर गुंडाळला. मोहम्मद रिझवानने (43) सर्वाधिक धावा केल्या. तर भुवनेश्वर कुमार 4, हार्दिक पंड्याने 3, अर्शदीप सिंगने 2 बळी घेतले. तर आवेश खानने एका फलंदाजाला माघारी पाठवाले. भारताने 148 धावांचे लक्ष्य 19.4 षटकात 5 गडी गमावून पूर्ण केले. पंड्याच्या मॅचविनिंग (33*) खेळी शिवाय रवींद्र जडेजाने 35 धावांचे योगदान दिले. माजी कर्णधार विराट कोहलीच्या बॅटमधूनही 35 धावा आल्या.

Back to top button